भाजपमध्ये हुकूमशाही नाही. पक्षाचे खासदार, नेत्यांची मुस्कटदाबी होत नाही असा दावा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नेतृत्वावर आरोप करून पक्ष सोडणे ही नाना पटोले यांची जुनी सवय असल्याचा टोला लगावला. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता नसून प्रतिमा सावरण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी त्यांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार असल्याचे सांगितले.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी खासदारकीचा दिलेला राजीनामा आणि पक्ष नेतृत्वावर सातत्याने केलेले आरोप यावर भाष्य केले. नाना पटोले काँग्रेसमध्ये जाणार हे भाजपला आधीपासून माहीत आहे. भाजपमध्ये कोणत्याही नेत्याची मुस्कटदाबी होत नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय भीतीपोटी पटोले अस्वस्थ होते. पटेल आले तरी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या नावाने पक्ष सोडणे ही पटोलेंची नौटंकी आहे. पक्ष नेत्यांवर आरोप करत त्यांनी आधीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे दानवे यांनी सूचित केले.