त्र्यंबकेश्वरच्या वारकरी विचार सभेत निर्णय त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिरास भव्य-दिव्य स्वरूप देताना ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा निर्धार मंदिरात झालेल्या वारकरी विचार सभेत करण्यात आला. ५० कोटी रुपये या आंतरराष्ट्रीय झळाळीसाठी खर्च करण्यात येणार असून निधी जमविण्यासाठी भक्तांनी कामास लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली ५१ सदस्यांची संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन करून समितीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील वारकरी प्रतिनिधी सर्वानुमते नियुक्त करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून २५ लाख, तर खासदाराने ५० लाख रुपये या संतपिठाच्या वैभवासाठी द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर जीर्णोद्धार तसेच परिसर विकासाच्या संदर्भात जिल्ह्यातील कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार वारकऱ्यांची वारकरी विचार सभा त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ समधी मंदिर संस्थानच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आली होती. बठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीराम वारकरी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पोपटराव फडोळ होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचा नियोजित आराखडा वारकऱ्यांसमोर ठेवला जावा, वारकऱ्यांची मते जाणून घ्यावी, विद्यमान संस्थानच्या कामकाजाची वारकऱ्यांना माहिती व्हावी, संस्थानने लोकवर्गणीतून ८० लाख रुपयांचा चांदीचा तयार केलेला पालखी रथ, तसेच दोन कोटी ७० लाख रुपये निधीतून साकारण्यात येणारे भक्त निवासाचे काम तसेच मंदिराच्या जीर्णोध्दाराविषयी सामूहिक संवाद व्हावा या हेतूने सभेचे नियोजन केल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी दिली. बैठकीत अनेकांनी आपले मते स्पष्टपणे मांडले. ज्येष्ठ विधीज्ञ संतोष खुटाडे यांनी जीर्णोध्दाराचे काम तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त केली. पुढील शतक डोळ्यासमोर ठेवून मंदिराचे काम करण्यात यावे, अशी सूचना खुटाडे यांनी केली. माधवमहाराज राठी यांनी संस्थानने आधी वारकरी बठकीचे नियोजन करताना पत्रव्यवहार करावा, मंदिर निर्माणाच्या आधी मंदिर परिसराच्या जागेचा विस्तार करावा, हवामानातील बदलाचा विचार करून मंदिर बांधकामात पाषाणाची निवड करावी,असे नमूद केले. एकनाथ महाराज गोळेसर यांनी भव्य मंदिर साकारण्यासाठी समाजातून भरभरून मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली. पालखी सोहळ्यात सर्वानी सोबत चलण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी पत्रकार सुरेश भोर, रामनाथ शिलापूरकर, दामोदर गावले, लक्ष्मीकांत शेंडे, संजय धोंडगे, अशोक घुमरे, राजाराम निगळ यांनीही मत मांडले. यावेळी नर्मदा प्रदक्षिणा करणारे प्रल्हाद महाराज भांड यांनी पाच हजार रुपये जीर्णोद्धारासाठी दिले. संत निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्थ पुंडलिकराव थेटे, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर आदी उपस्थित होते.