सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन नाशिक : देशावर अनेक आघात आणि आक्रमणे झाली. तेव्हां हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. परंतु, संत महापुरुषांच्या तपश्चर्येमुळे हा देश अक्षयवटाप्रमाणे उभा राहिला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथील नक्षत्र लॉन्स येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले. मोक्ष हा धर्मासोबत चालतो. मोक्ष म्हणजे अध्यात्मिक साधना आणि पुरुषार्थ होय. जोपर्यंत शरीर असते, तोपर्यंत अर्थ आणि काम या दोन्ही गोष्टी असतात. मात्र यांना अनुशासित करण्यासाठी धर्म असतो. तो धर्मच सर्व समाजास एकसंध ठेवतो. समाजातील संत आणि महात्म्यांचा कळवळा हा लोकांसाठी असतो. ते स्वत:साठी काही मागत नाहीत. मला जे मिळाले ते सर्वांना मिळावे यासाठी ते आयुष्यभर झटतात, असेही डॉ. भागवत यांनी नमूद के ले. या प्रसंगी मानपत्र, महावस्त्र आणि पुष्पहार देवून डॉ. भागवत यांनी स्वामी सवितानंद यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार केला. स्वामी सवितानंद अमृत महोत्सव समितीतर्फे ‘सविता अघ्र्य’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. स्वामी सवितानंद यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना आपण समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी स्वामी सवितानंद सेवा समितीतर्फे सैनिक कल्याण निधीस तीन लाख तर श्रीराम जन्मभूमी न्यासला तीन लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरुपात प्रदान करण्यात आला.