धामोरीफाटा (ता. राहुरी) येथील संभाजी शिवाजी उगले या तरुणाचे अपहरण केल्याच्या आरोपावरुन सात जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपहरण झालेल्या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध लागलेला नव्हता.
जगदिश शिवाजी उगले याने दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात गौतम माळी, शंकर पवार, किशोर माळी व अन्य चार आरोपींविरुध्द अपहरण, मारहाण, लुटमार आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी शेंगेपल्लु अधिक तपास करीत आहे. संभाजी उगले हा त्याचा भाऊ जगदीश यांच्यासोबत धामोरी ते बाभुळगाव या रस्त्याने जात असतांना एका मोटारीतून आलेल्या गौतम माळी व त्याच्या साथीदारांनी संभाजी यास शिवीगाळ व धक्काबुकी केली. तलवार लावून ५० हजार रुपये रोख, दोन तोळ्याची सोन्याची साखळी काढून घेवून नंतर त्याला मोटारीत बसवून पळवून नेले. त्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी जगदीश याला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्यादी आहे. आज, शनिवारी राहुरी पोलिस ठाण्यावर फिर्याद दाखल करुन घ्यावी म्हणून मोठा जमाव जमला होता. रात्री उशिरापर्यंत संभाजीचा शोध लागला नाही.