वेळोवेळी शासनाला निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासन व प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ तालुका शिवसेनेच्या वतीने येथे जुन्या तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले. अपवाद वगळता दुष्काळग्रस्तांना शासनाच्या वतीने पाहिजे तशी मदत होत नसल्याने शासनाच्या भूमिकेविषयी यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. तहसीलदार अनील गवांदे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून चर्चा केली असता मागण्यांसंदर्भात तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांचे मागण्यांचे निवेदन चार मे रोजी उपविभागीय अधिकारी माटांडा राजा दयानिधी व तहसीलदार अनील गवांदे यांना देण्यात आले होते. निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन व प्रशासन दरबारी दखल घेतली न गेल्याने साखळी उपोषण करण्यात आले. आंदोलनास शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप, शहरप्रमुख किरण देवरे आदी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीने शेतकरी, शेतमजूर संकटात सापडल्याने बीपीएल अन्त्योदय योजनेप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा, शेतकरी सध्या आíथक कोंडीत सापडल्याने जून महिन्यात शेतकऱ्याला कपाशी, बाजरी, भुईमूग या बियाण्यांचे कृषिविभागामार्फत मोफत वाटप करावे, दुभत्या जनावरांची पाहणी करून जनावरांना आहे त्या ठिकाणी चारा व पाण्याची सोय करावी, ऑगस्टपर्यंत चारा उपलब्ध होणार नसल्याने भाकड व उर्वरित जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, गरज असेल त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरु करावे, शेतकऱ्यांची चेष्टा न करता संपूर्ण वर्षांचे वीज देयक माफ करावे, शेततळ्यासाठी तोकडे अनुदान मिळत असल्याने सर्वसामान्य शेतकरी काम करण्यास धजावत नाही. त्यामुळे शेततळ्यास दोन लाख रुपये अनुदान द्यावे, या मागण्या करण्यात आल्या आहेत.