राज्य शासनाच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार, हरसूलच्या तहसिलदारांकडून तक्रारीची दखल 

नाशिक  : गावाला दुष्काळ पुजलेला. पाण्यासाठी दाही दिशा नित्याच्या आहेत. गावाची होणारी ही फरफट थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, समर्थक आणि ग्रामस्थ यांनी पाठपुरावा सुरू के ला. ‘आपलं सरकार’ या ऑनलाइन तक्रारीच्या पोर्टलवर तक्रारी केल्या. या सर्व प्रयत्नांची फलश्रृती म्हणजे हरसूल परिसरातील गावंध गावासह अन्य पाच आदिवासी पाडय़ांचा पाणी प्रश्न सुटला.

हरसूल, पेठ परिसरातील पुकार फिल्म प्रोडक्शनच्या वतीने गावंध गावात काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘सपान सरलं’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना तेथील महिला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना त्यांना दिसल्या. राम खुर्दळ,  मायाताई खोडवे तसेच अन्य काही कलावंत चित्रीकरणात व्यस्त होते. महिलांची पाण्यासाठी होणारी परवड पाहून त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले. ग्रामसेवकांसह तहसीलदारांना निवेदन दिले. महिलांची पाण्यामुळे होणारी फरफट, त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, मुलींच्या शिक्षणाचा रखडलेला प्रश्न यासह अन्य मुद्द्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. तहसीलदारांनी या निवेदनाची दखल घेत पाणी योजना सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. परंतु, अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यापलीकडे फारसे काही केले नाही. याच कालावधीत आपलं सरकार या पोर्टलवरही ऑनलाईन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल हरसूलच्या तहसीलदारांनी घेतली.

गावचा पाणी प्रश्न समजून घेत त्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु, टाळेबंदीमुळे काम रखडले. नुकतेच हे काम पूर्ण झाले. पावसाळ्याच्या सुरुवातीला गावंध परिसरातील पळशी, पिंपळवाडी, खोपडीवाडा, बोटविहीर आदी पाडय़ांवर कू पनलिका, विंधनविहिरी करण्यात आल्या. यामुळे येथील काही गावांचा पाणी प्रश्न सुटला. पाण्यासाठी भटकंती टळल्याने महिला वर्गही आनंदित आहे. याविषयी ग्रामस्थ रमेश कुंभार यांनी आपले म्हणणे मांडले. जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. तेव्हा आम्ही गावातील काही ग्रामस्थ यात सहभागी झालो होतो. गावातील लोक आमच्यावर हसायचे. परंतु, चित्रपटातील कलावंत आणि अन्य सहकाऱ्यांनी याचे वाईट वाटून घेतले नाही. गावातील पाणी प्रश्न लक्षात आल्यावर तो सोडविण्यासाठी खुर्दळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सातत्याने प्रश्न मांडले गेल्यामुळे आज गावंधसह परिसरातील पाच गावांचा पाणी प्रश्न सुटला याचा आनंद वाटतो, असे त्यांनी नमूद केले.