मार्च २०१७ मध्ये पहिलाच प्रयोग भाषा हे जीवन व्यवहारात विचारांचे आदानप्रदानाचे व स्वप्रकटीकरणाचे सर्वात प्रभावी माध्यम. भाषांचा विशेषत मातृभाषेचा अभ्यास हा विषय म्हणून नव्हे, तर भाषा म्हणून होणे अधिक आवश्यक ठरते. यासाठी राज्य शिक्षण मंडळाने सर्व भाषांची प्रचलित पाठय़पुस्तके नव्या धोरणांनुसार बनविली आहेत. तसेच मंडळाने कृती पत्रिकेवर भर दिला असून मार्च २०१७ मध्ये दहावी परीक्षेत भाषा विषयासाठी प्रथमच त्याची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. प्रचलित परीक्षा पद्धतीत प्रश्न पत्रिकेमध्ये स्मरण, पाठांतर यावर भर देणाऱ्या प्राधान्याने ज्ञान या कौशल्याचे मूल्यमापन करणाऱ्या प्रश्नांचा अंतर्भाव असतो. यामुळे मंडळाच्या मूळ उद्दिष्टाला बगल दिली जात आहे. विद्यार्थी ज्ञानार्थी होण्याऐवजी परीक्षार्थी होत आहे. अध्यापनातील या त्रुटींचा विचार करता मूल्यमापन पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने कृती पुस्तिका ही संकल्पना मांडण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेऐवजी कृती पत्रिका हा मूल्यमापन पद्धतीत बदल २०१५-१६ पासून इयत्ता नववीसाठी लागू करण्यात आला. आता नव्या शैक्षणिक वर्षांत हा बदल माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी करण्यात आला आहे. प्रचलित पाठय़पुस्तकात कोणताही बदल न करता मूल्यमापन पद्धतीत झालेला बदल शिक्षकांसाठी आव्हानात्मक आहे. केवळ पाठांचे अध्यापन व स्वाध्यायाची तयारी या कार्यपद्धतीतून बाहेर पडून पाठय़पुस्तकातील आशयाचा सहसंबंध जीवनाशी जोडला जाणे, विद्यार्थ्यांच्या चतुरस्र निरीक्षणशक्तीला संधी देणे व विद्यार्थ्यांचे निरीक्षण, अवांतर वाचन, चिकित्सक विचार, संकल्पना आणि स्वानुभव यांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य हे अध्ययन पद्धतीचे अधिष्ठान राहणार आहे. ज्ञानरचनावादावर आधारित स्वयंअध्ययन व कृतिशिलतेला वाव देण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने राज्य मंडळाने लोणावळा येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतले. तसेच १८ जुलैपर्यंत महाराष्ट्रात विभाग आणि जिल्हा स्तरावर प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. कृती पत्रिकेचा आराखडा, नमुना कृती पत्रिका आणि अभ्यासार्थ नमुना कृती पत्रिका मंडळाने प्रकाशित केल्या आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावर त्या उपलब्ध आहेत. अभ्यास मंडळातील सदस्यांनी केलेल्या कृती पत्रिकेचे विनामूल्य वितरण सुरू असून वर्गात शिक्षकांनी ज्ञानरचनावादाचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.