शहर व तालुक्यातील विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा तसेच लेखी निवेदन दिल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आल्याने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पक्षातर्फे याआधी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यापैकी बहुतांश मागण्या मंजूर न झाल्याने ३० मे रोजी निवेदनाव्दारे मागण्या तहसील प्रशासनास कळविण्यात आल्या होत्या. परंतु, त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी, चारा, कर्ज यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. पीक कर्ज माफ करण्यात यावे, जनावरांसाठी चारा त्वरित उपलब्ध करावा, कांद्याला दोन हजार रूपये रुपये हमी भाव मिळावा, बचत गटांना तत्काळ मागेल त्या व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करावे, कपाशी व मका बियाणांचे मोफत वाटप करावे, एससी, एसटी व इतर मागासवर्गीयांना शेततळ्यासाठी ७५ टक्के अनुदान द्यावे, धुळगाव येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजूर असूनही कामास विलंब होत असल्यामुळे तत्काळ काम सुरू करावे, ग्रामपंचायत हद्दीतील बेघर व भूमिहीन लोकांच्या घरांचे अतिक्रमण २०१५ पर्यंत कायम करावे, न्हारखेडे खुर्द व बुद्रुक येथील दलित वस्तीच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण त्वरित हटवून स्मशानभूमी दुरुस्त करावी, विधवा, घटस्फोटीत व अपंगांना जमिनीची अट रद्द करून मासिक वेतन सुरू करावे, सर्वसाधारण शिधापत्रिकाधारकास ३५ किलो धान्य द्यावे या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदन देतांना महेंद्र पगारे, विजय घोडेराव, विक्रम पवार, शशिकांत जगताप, भाऊसाहेब गरुड आदी उपस्थित होते.