सुरक्षित वाहतुकीसाठी वाहनांची योग्यता चाचणी पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने होऊन अपघात कमी करण्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने देशात प्रथमच येथे कार्यान्वित झालेले स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र विविध स्वरूपांच्या आक्षेपांमुळे अडचणीत आले आहे. या यंत्रामार्फत विविध त्रुटी दर्शवून वाहने वारंवार नापास केली जात असल्याने निर्माण झालेल्या तिढय़ात खा. हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी मध्यस्ती करत पुढील दोन दिवस केंद्र बंद ठेवून वाहन तपासणी दृश्य स्वरूपात करण्याचा तोडगा काढला. त्याची अंमलबजावणी महिनाभर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचे संचालन करणाऱ्या रोसमेर्टा टेक्नॉलॉजीसने पारदर्शक तपासणीमुळे आरटीओ दलालांचा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे या केंद्राच्या कामात अवरोध निर्माण केला जात असल्याचा आरोप केला आहे. केंद्रास विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास वाहनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या उपक्रमास खीळ बसणार असल्याची तक्रार कंपनीने केली.

सुस्थितीत नसलेल्या वाहनांच्या वापरामुळे अपघातात भर पडते. ही बाब लक्षात घेऊन वाहनांच्या काटेकार चाचणीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुढाकारातून नाशिक येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्राची स्थापना करण्यात आली. नाशिकचे केंद्र १४ ऑक्टोबर रोजी कार्यान्वित झाले. स्वयंचलित यंत्रणेद्वारे तपासणी सुरू झाल्यावर वाहनांची स्थिती सुधारून सुरक्षित वाहने रस्त्यांवर धावतील असा कयास होता. परंतु, तो उद्देश विविध आक्षेपांमुळे अडचणीत आला आहे. केंद्रातील वाहनांच्या तपासणी यंत्रामार्फत स्वयंचलित पद्धतीने होत असल्याने अनेक वाहने महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये नापास झाली. एकदा वाहन नापास झाले की, पुन्हा शुल्क भरून वाहनधारकांना यावे लागते. या प्रक्रियेसाठी वारंवार खेटा माराव्या लागत असल्याने आणि केंद्रात वाहनांच्या किरकोळ त्रुटी दूर करण्यासाठी व्यवस्था नसल्यातून हा वाद निर्माण झाला. शुक्रवारी खा. हेमंत गोडसे यांनी वाहनधारकांच्या समस्या जाणून घेतल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या आयुक्तांशी संपर्क साधून तूर्तास हे केंद्र बंद ठेवून दृश्य स्वरूपात चाचणी करण्याची मागणी केली. मागील काही दिवसांत वाहने सातत्याने नापास होत असल्याने प्रमाणपत्राविना दीड ते दोन हजार वाहने रखडली आहेत. दृश्य स्वरूपात तपासणी करून त्यांचा विषय मार्गी लावावा तसेच स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची परदेशी यंत्रणा आणि भारतीय वाहतुकीचे निकष यांचा ताळमेळ बसेपर्यंत महिनाभर चाचणी घेऊन तोपर्यंत दृश्य स्वरूपात वाहनांची तपासणी करण्याचा मुद्दा मांडला. त्यास संबंधित विभागाचे केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. दरम्यान नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख जीवन बनसोड यांनी तूर्तास केंद्र दोन दिवस बंद ठेवण्याची सूचना प्राप्त झाल्याचे नमूद केले.
या केंद्राचे संचालन करणाऱ्या रोसमेर्टा टेक्नॉलॉजीसने या संपूर्ण घडामोडी आणि वादाला आरटीओ एजंट्सला जबाबदार धरले आहे. केंद्रात केलेल्या प्रारंभीच्या चाचणीत वाहनांची अवस्था अतिशय खराब असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रात वैज्ञानिक निकषावर आधारित चाचणी केली जाते. दलालांचा धंदा धोक्यात आल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले आणि चाचणी केंद्रातील कर्मचाऱ्यांना धमकावले जात आहे.
संतप्त जमावाने शिवीगाळ करून केंद्र बंद पाडले. या घटनेमुळे कर्मचारी आणि साधनांची सुरक्षितता धोक्यात आल्याकडे कंपनीचे अधिकारी एस. के. जैन आणि सुमित ललित यांनी लक्ष वेधले. योग्य वाहनासाठीच्या निकषात वाहनांचे दिवे तपासणीत ५० टक्के, ब्रेकमध्ये दोन टक्के, स्पीडमीटर ४५ टक्के, सुरक्षिततेच्या निकषात ७८ टक्के व ११ टक्के वाहने तपासणीत नापास झाल्याचे सांगण्यात आले.