सामाजिक वनीकरणाचा अजब कारभार तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात गट लागवड अंतर्गत रस्त्यालगत वृक्ष लागवड करण्यात आली होती. लागवडीबरोबर वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष करीत या वृक्षाच्या संरक्षणासाठी चक्क कांद्याच्या गोण्या वापरण्यात आल्या असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासाठी लाखो रुपयांचा निधी वापरला असल्याने हा निधी वाया गेला. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी यावर्षी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट ठेवण्यात आले होते. वृक्ष लागवडीसाठी शासनाच्या बरोबर शाळा, सामाजिक संस्था यांनीही पुढाकार घेत मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड केली होती. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची जबाबदारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाने मात्र केवळ वृक्ष लागवड करण्याचा दिखाऊपणा केल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील वैतरणा रस्त्यावर असणाऱ्या वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात जुना रस्ता गेल्याने शासनाच्या वतीने कुनरेली ते भावली अशी पाच किलोमीटर अंतर रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. या रस्ता रहदारीसाठी सुरु झाल्यानंतर यावर्षी या रस्त्यालगत सामाजिक वनीकरण विभागाने दुतर्फा वृक्ष लागवड केली. या वृक्षाच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षिततेसाठी सामाजिक वनीकरण विभागाने प्रत्येक झाडाला चक्क तीन लाकडे उभी करून त्यावर कांद्यच्या गोणीचे आच्छादन टाकण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच या नकली संरक्षण जाळ्याचा रंग उडाला व सामाजिक वनीकरण विभागाचे पितळ उघडे पडले. दरम्यान सामाजिक वनीकरण विभागाने पुन्हा मजूर लावून या वृक्षाभोवती कांद्याच्या गोण्याचा वापर केल्याने आश्र्च्र्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वृक्षाच्या संवर्धनासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च असताना मात्र सामाजिक वनीकरण विभाग शासनाची दिशाभूल करीत असल्याने या वृक्षलागवड व संवर्धनाची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवा काळे यांनी केली आहे.