उड्डाणपुलावरून उडी मारल्याने तीन जखमी ल्ल ग्रामस्थांचा दोन तास रास्तारोको मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळीभोई गावातील उड्डाण पुलावर शुक्रवारी सकाळी मालमोटारीने धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार झाले. मालमोटारीने पुलालगत उभ्या असणाऱ्यांना चिरडले. हे पाहिल्यानंतर कठडय़ाजवळ उभ्या असणाऱ्या तिघांनी भीतीने थेट पुलावरून उडी मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त शेकडो ग्रामस्थ महामार्गावर उतरले आणि त्यांनी वाहतूक बंद पाडली. थांबा नसल्याने स्थानिकांना उड्डाण पुलावर जाऊन बसची प्रतीक्षा करावी लागते. ही बाब जीवघेणी ठरल्याचे सांगत ग्रामस्थांनी जवळपास दोन तास महामार्गावरील वाहतूक बंद पाडली. या घडामोडींमुळे शहर व गावातून जाणाऱ्या महामार्गावर आवश्यक ते उपाय योजण्यात यंत्रणा कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे. याआधी महामार्गावर त्रुटींमुळे अपघात होऊन कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. वडाळीभोई येथे त्याची पुनरावृत्ती झाली. वडाळीभोई गावातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाण पुलावर सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. बस थांबा नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी उड्डाण पुलावर थांबावे लागते. शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थ आणि विद्यार्थी नेहमीप्रमाणे बसची प्रतीक्षा करत होते. नातेवाईकांना सोडण्यासाठी एक व्यक्ती दुचाकी घेऊन आली. दुचाकी बाजुला उभी करून तो संबंधितांशी चर्चा करीत असतानाच भरधाव मालमोटारीवरी चालकाचे नियंत्रण सुटले आणि तिने कठडय़ालगत उभ्या असणाऱ्यांना चिरडले. यावेळी पुलाच्या पुढील बाजूस काही युवक उभे होते. मालमोटार आपल्याही अंगावर येणार हे पाहून त्यांनी क्षणार्धात पुलावरून खाली उडी मारली. २५ फुटावरून उडी मारल्याने ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. उड्डाण पुलावर त्यापेक्षा भयावह स्थिती होती. मालमोटारीखाली सापडून बाजीराव खंडेराव ठाकरे (७०, नांदूरटेक चांदवड), दिलीप गांगुर्डे व त्यांच्यी पत्नी रंजनाबाई (पिंपळनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुलावरून उडी मारणारे सागर निवृत्ती आहेर, थॉमस अॅन्थोनी, थॉमस कुरवले हे जखमी झाले. अपघाताची माहिती गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी घाव घेतली. बस थांबा नसल्याने स्थानिक विद्यार्थी व प्रवाशांना बस पकडण्यासाठी दररोज उड्डाण पुलावर येण्याची कसरत करावी लागते. पोलीस यंत्रणेला वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी वेगळ्याच गोष्टीत अधिक रस असतो, असा आरोप ग्रामस्थांनी केला. गावात तातडीने बस थांबा करून स्थानिकांची उड्डाण पुलावर जाण्यापासून मुक्तता करावी, अशी मागणी करीत महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आंदोलकांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ११ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्ती करून सर्वाची समजूत काढली. शाळा सुटण्याची व भरण्याची वेळ झाल्यामुळे आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांंना बसू शकतो. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास सूचविले. त्यावेळी आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दरम्यान, अपघातानंतर मालमोटार चालकाने पळ काढला. या प्रकरणी वडाळीभोई दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातग्रस्त झालेली दुचाकी नेमकी कोणाची, याची स्पष्टता होऊ शकली नाही.