लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सात महिन्यांपासून बंद असलेल्या शहर बससेवेस गुरुवारी नव्याने सुरुवात झाली. पहिला दिवस असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. शहर परिसरातील काही भागांत बस धावलीच नसल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला.

करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्याच्या २२ तारखेपासून बंद असलेली राज्य परिवहनची बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू झाली. आंतर जिल्हा, जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू झाली असताना शिथिलीकरणाच्या प्रक्रि येत शहर बससेवा कधी सुरू   होते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अनेकांनी याबाबत राज्य परिवहनच्या कार्यालयातही संपर्क साधला. अखेर गुरुवारपासून शहर बससेवेला सुरुवात झाली.

शहरातील निमाणी बस स्थानकापासून नाशिक रोड,  श्रमिक नगर, उत्तम नगर, अंबड आणि पाथर्डी गाव या मार्गावर पहिल्या टप्प्यात बससेवा सुरू  झाली. पहिल्या दिवशी के वळ १० बस धावल्या. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत बससेवा सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद लाभला. नाशिकरोड, उत्तमनगरकडे जाणाऱ्या बससेवेस उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु अन्य मार्गावर तसा प्रतिसाद मिळाला नाही. महामंडळाचे वाहतूक अधिकारी कै लास पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बससेवेचा पहिला दिवस असल्याने गर्दी तुरळक राहिली. सद्य:स्थितीत १० बस दिवसाला १५ ते २० फे ऱ्या मारत आहेत. सोमवारनंतर मागणीनुसार फे ऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रदीर्घ विश्रांतीनंतर शहर बससेवा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.