खिडक्यांना जाळी बसविण्याचा निर्णय सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात घडलेल्या रुग्णांच्या आत्महत्याच्या गंभीर घटनेनंतर रुग्णालयाच्या इमारतीला तात्पुरती व्यवस्था म्हणून रुग्णालयाच्या खिडक्यांना जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रस्ताव पाठवून सहा महिने झाले तरी त्यावर कोणताच निर्णय झालेला नाही. आरोग्य खाते रुग्णांबाबत कसे असंवेदनशील आहे याबाबत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित करून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. संदर्भ सेवा रुग्णालय कधी लिफ्ट बंद, तर कधी बंद असणारी सीटी स्कॅन यंत्रणा तसेच आवश्यक साधनसामग्री, औषधांचा अभाव अशा कारणांनी नेहमीच चर्चेत असते. याबाबत अपुरे मनुष्यबळ, रिक्त पदे, निधी आदी कारणे रुग्णालय व्यवस्थापनाकडून दिली जात असतात. काही दिवसांपूर्वी वातानुकूलित यंत्रणा तसेच पंखे बंद पडल्याने रुग्णांना घरून पंखे आणण्यास सांगितले गेले होते. त्यावरून बराच गदारोळ उडाला. सोनोग्राफीसह सिटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने बाहेरगावहून येणाऱ्या गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची परवड होत आहे. दुसरीकडे वैद्यकीय पदाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सेवा देण्यास आरोग्य विभाग कमी पडत आहे. कोणत्याही समस्यांवर प्रस्ताव पाठविला आहे, लवकरच आवश्यक ती कारवाई अथवा उपाययोजना होईल असे उत्तर देत तक्रारदारांची बोळवण केली जाते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही काही रुग्ण उपचार घेतात. आर्थिक परिस्थितीने नैराश्य आलेल्या रुग्णांना आजारपणाची भर पडल्यावर या नैराश्यात अधिकच वाढ होते. त्यांना समुपदेशन करण्याची व्यवस्था नाही. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी नाममात्र संवाद असतो. परिणामी, अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. आजारपणाला कंटाळत वर्षभरात या ठिकाणी दोन रुग्णांनी आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडल्या आहेत. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या खिडकीची काच फोडत रुग्णांनी उडय़ा मारल्या होत्या. ज्या ठिकाणी या घटना घडल्या, तिथे जाळी बसवत व्यवस्थापनाने वेळ निभावून नेली आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद गुठे यांनी अपघात ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणी घटनेच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी खिडक्यांना जाळ्या बसविल्याचे सांगितले. त्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले. व्यवस्थापनाने स्वत: पदरमोड करत ही व्यवस्था केली आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध झाला नाही. संपूर्ण रुग्णालयाला जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मंत्रालयाकडे दिला आहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही निधी किंवा अन्य काय उपाययोजना कराव्यात याची माहिती मिळालेली नाही, असे गुठे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागाने संदर्भ सेवा रुग्णालयाची इमारत बांधली. इमारतीच्या देखभालीची जबाबदारी संबंधित विभागावर सोपविण्यात आली आहे. वरकरणी इमारत देखणी दिसते. इमारतीत शिरल्यावर वेगवेगळ्या समस्या लक्षात येतात. इमारत पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी खिडक्या तसेच त्यांना जाळ्या बसविण्याचा आदेश होता. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून संबंधित विभागाने पहिल्या, दुसऱ्या मजल्यास जाळ्या बसविल्या. जेणेकरून चोरांना रुग्णालयात सहज येता येणार नाही. वस्तू लंपास होणार नाही. नंतरच्या टप्प्यात तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील खिडक्यांना अद्याप जाळ्या बसविलेल्या नाहीत.