सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याचे भान विद्यार्थ्यांमध्ये शालेय व महाविद्यालयीन जीवनात यावे, या हेतूने आणि गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पालवी फाऊंडेशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने यंदा विघ्नहर्ता प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत पर्यावरणाबाबत सजगता निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात लघुपटाचे प्रदर्शन, निबंध स्पर्धा आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पालवी फाऊंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील यांनी दिली. या वेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा गावंडे, दीपाली खेडकर, स्वाती खंदारे, डॉ. राजश्री कुटे आदी उपस्थित होत्या. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फाऊंडेशनच्या माध्यमातून काही महिला एकत्र झाल्या आणि त्यांनी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लहान मुलांसाठी नेत्रतपासणी शिबीर, आदिवासी भागात खेळणी आणि कपडे वाटप, सर्व रोगनिदान शिबीर आदी उपक्रम राबविले आहेत. गणेशोत्सवादरम्यान होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गतवर्षी फाऊंडेशनने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरच्या घरी विसर्जित करता याव्यात, याकरिता अमोनियम बाय काबरेनेटच्या पावडरचे वितरण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातूनच प्रेरणा घेत गणेशोत्सव पर्यावरणस्नेही करण्यासाठी यंदा विघ्नहर्ता प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी गणेशमूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करण्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून विशेष लघुपट तयार करण्यात आला आहे. शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयांपर्यंत तो पोहोचविण्यात येत आहे. त्यास शैक्षणिक संस्थांचा प्रतिसाद मिळाल्याचे पवार यांनी नमूद केले. घरातील धातूच्या मूर्तीची स्थापना करावी, शाडू माती किंवा नारळ, सुपारी, सुकलेली पाने, कापूस, विविध कापड, भांडी कागदाचा लगदा, भुसा आदींचा वापर मूर्ती बनविण्यासाठी तसेच सजावटीसाठी करावा, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर तिचे विसर्जन अमोनियम बाय काबरेनेट पावडरमिश्रित पाण्यातच करावे, मूर्ती विसर्जित न करता दान करावी, असा संदेश या लघुपटाद्वारे देण्यात आला आहे. याच काळात निबंधलेखन आणि पर्यावरण गणेशमूर्ती बनवा स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. त्यातील प्रत्येक गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना सायकल (प्रथम), सॅमसंगचा शैक्षणिक टॅब (द्वितीय), टायटनचे घडय़ाळ (तृतीय), शालोपयोगी साहित्य (प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ) अशी बक्षिसेही दिली जाणार आहेत. निबंधलेखन स्पर्धा शाळांच्या माध्यमातून तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. याच तीन गटांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवा स्पर्धाही घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी घरी तयार केलेली मूर्ती शाळेत जमा करायची असून ती शाडूमातीव्यतिरिक्त सुकलेले नारळ, विविध कागद, विविध कडधान्ये सुपारी, सुकलेली पाने, कापूस, विविध कापड, भांडी, कागदाचा लगदा, भुसा आदींनी तयार करायची आहे. या मूर्तीच्या मूल्यमापनाची प्राथमिक फेरी शालेय स्तरावर कला शिक्षकांकरवी घेतली जाईल. निबंधलेखन आणि मूर्ती स्पर्धा या शाळा आणि महाविद्यालयांच्या मार्फत घेतल्या जाणार असून अधिक माहितीसाठी ९८३४५ ६४४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.