सर्दी, खोकला, ताप आजार बळावले गोदावरीच्या पुरामुळे आणि सततच्या पावसामुळे शहरात सर्दी, खोकला, ताप यांसह त्वचेचे विकार मोठय़ा प्रमाणावर बळावले आहेत. जिल्हा परिसरातील दवाखाने रुग्णांच्या गर्दीमुळे ओसंडून वाहू लागले आहेत. मागील आठवडय़ात जोरदार पावसामुळे गोदाकाठ संपूर्णपणे पाण्यात गेला होता. पुराच्या पाण्यामुळे चिखलासह अन्य केरकचरा शहरी भागात आल्यामुळे आरोग्यविषयक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. अनेकांच्या अंगावर बारीक पुरळ किंवा पुळ्या येत असून हात-पाय किंवा शरीराच्या विशिष्ट एका भागास खाज येत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक जाणवत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले असल्याचे सांगितले. जे लोक सतत कामानिमित्त बाहेर आहेत. ज्यांचा वेगवेगळ्या कारणांमुळे पाण्याशी संबंध येतो. बाहेरील पाणी धुलीकणांसह अन्य जीवांच्या कुजण्यामुळे दूषित झाले आहे. अशा पाण्यामुळे व्यक्तींच्या पायाला, शरीराला खाज येते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा थेट संपर्क येणार नाही, यादृष्टीने पादत्राणांची निवड करावी. बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत, असे आवाहन डॉ. सैंदाणे यांनी केले आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखान्यातही रुग्णांची गर्दी चार ते पाच दिवसांत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागासह अन्य खासगी दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखणे यासह डोके जड पडणे, उलटय़ा, जुलाब या रुग्णांची संख्या वाढली आहे. या आजाराच्या यादीत आता त्वचेचे आजार असलेले रुग्णही वाढले आहेत.