जिल्ह्य़ातील निम्म्या भागात दुष्काळाचे चटके बसत असताना जायकवाडी धरणासाठी नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधून ३२४० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागण्याची वेळ आल्याने जिल्ह्य़ातील नाशिकसह येवला, मनमाडवर जलसंकट ओढवणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाणी सोडण्यामुळे औद्योगिक वसाहतींसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या आरक्षणालाही कात्री लागणार आहे. त्याची किंमत पाण्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना बसणार आहे.

जायकवाडी धरण ६५ टक्क्य़ांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणी वाटप तत्वानुसार उध्र्व गोदावरी खोऱ्यातील गंगापूर, दारणा, पालखेड, प्रवरा, मुळा, भंडारदरा धरण समूहातून मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार आढावा घेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून ३.२४ टीएमसी, तर नगर जिल्ह्य़ातील धरणांमधून पावणे सहा टीएमसी असे एकूण ८.९९ टीएमसी अर्थात ८९९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकचा विचार करता शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहातून तसेच मनमाड, येवल्यासह अनेक गावांची तहान भागविणाऱ्या पालखेड धरण समूहातून प्रत्येकी ६०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी धरणासाठीसाठी द्यावे लागणार आहे. दारणा धरण समूहातून २०४०  दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागेल.  दिलासादायक बाब  म्हणजे गंगापूर, पालखेडमधून सर्व पाणी घेण्याऐवजी ती कसर दारणा समूहातून भरून काढण्याचा विचार महामंडळाने केल्याचे आदेशावरून लक्षात येते.

नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समुहात महापालिका, औद्योगिक विकास महामंडळ, एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्र, लष्करी छावणी मंडळ, सिंचनासाठी गोदावरी कालव्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरक्षणांचा समावेश आहे. लोकसंख्या वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज वाढत आहे. धरणनिहाय पाणी आरक्षण अंतिम करताना घटणाऱ्या पाण्याची किंमत सर्वाना मोजावी लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सिंचनाचे एक आवर्तन कमी होऊ शकते. तशीच स्थिती पालखेड धरण समूहाची आहे.

पालखेड धरण समूहावर मनमाड, येवला, निफाड, मनमाड रेल्वे विभागासह अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. सद्यस्थितीत मनमाडला २० दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो. येवल्याला तीन-चार दिवसाच्या अंतराने पाणी मिळते. दुष्काळी भागाची पालखेड धरण समूहावर मोठी भिस्त आहे. त्यातून पाणी सोडावे लागू नये म्हणून पाटबंधारे विभागाने अनेक मुद्दे मांडले होते. तरीही दोन्ही धरणांमधून एकूण १२०० दशलक्ष घनफूट पाणी द्यावे लागणार आहे. या धरणांवर अवलंबून घटकांना उन्हाळ्यात पाणी देताना अडचणी उद्भवतील. दारणा समूहातून पाणी सोडण्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण या समूहातील १० टीएमसी पाणी आधीपासून मराठवाडय़ातील काही भागासाठी आरक्षित आहे. त्या समूहात काही पाणीपुरवठा योजना वगळता नाशिकचे फारसे आरक्षण नाही.

तयारीअंती धरणांचे दरवाजे उघडणार

नाशिक, नगरमधून पाणी सोडण्याच्या कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासन, महावितरण, पोलीस यंत्रणा आदी घटकांशी चर्चा केली जाईल. ही कार्यवाही ३१ ऑक्टोबपर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने नियोजन सुरू केले आहे. बंधाऱ्यातील फळ्या काढणे, पाणी चोरी होऊ नये म्हणून काठावरील गावांचा वीज पुरवठा बंद ठेवणे आदी तयारी करावी लागेल. त्याकरिता पथके स्थापन केले जातील. पुढील काही दिवसात ही तयारी झाल्यानंतर महामंडळाच्या आदेशानुसार पाणी सोडले जाईल. त्यामुळे तीन धरण समूहातील जलसाठा कमी होईल. शिल्लक साठय़ाचा नव्याने हिशेब करून जिल्हा प्रशासनाशी विचारविनिमय केला जाईल. दुष्काळात प्रशासनाला काही अतिरिक्त गरज आहे काय, याचा विचार करून शिल्लक पाण्याचे नियोजन होईल.

– राजेश मोरे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

* आरक्षणांना कात्री लागणार

* जायकवाडीला ३२४० दशलक्ष घनफूट पाणी देण्याच्या निर्णयाचा परिणाम