त्र्यंबक पालिकेच्या निर्णयास विरोध

त्र्यंबक शहर परिसरात अतिक्रमण, अस्वच्छतेचा मुद्दा चर्चेत असतांना नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत आहे. पालिकेच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. आधी नियमितपणे पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या त्र्यंबक शहर परिसरात दिवसाकाठी हजाराहून अधिक भाविक येतात. पर्यटक तसेच भाविकांना सेवा सुविधा देण्याचा ताण नगरपालिका प्रशासनावर पडतो. अपुऱ्या मनुष्यबळावर नगरपालिका प्रशासन हा गाडा ओढत आहे. यामुळे नागरिकांसह भाविकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काही निमुळत्या रस्त्यांवर, गल्ली-बोळात मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण आहे.

अतिक्रमणाचा श्रावणी सोमवार फेरी, दर सोमवारी निघणारी त्र्यंबकराजाची पालखी आणि अन्य धार्मिक उत्सवात फटका बसतो. त्र्यंबक देवस्थानच्या बाहेर पडल्यानंतर भाविक तसेच पर्यटकांना नैसर्गिक विधीसाठी नगरपालिकेने कोणत्याही प्रकारे स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे भाविक, पर्यटक मंदिरामागील बाजूला असलेल्या आखाडा रस्त्यावर, नदी काठावर, घाटावरच नैसर्गिक विधी करत असल्याने परिसरात घाण जाणवते. तसेच, नगरपालिका प्रशासनाच्या केवळ दोन घंटागाडय़ा असून यातून कचरा संकलित केला जातो. या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा नगरपालिका प्रशासनाने त्र्यंबक शहर परिसरात पाणी मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही नगरपालिकेने पाणी मीटर बसविले. तो खर्च नागरिकांकडून वसूल केला, पण पुरेशा प्रमाणात पाणी दिले गेले नाही. काही ठिकाणी मीटर फिरलेच नाही. हा पूर्वानुभव गाठीशी असल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

त्र्यंबकच्या जवळपास चार धरणे आहेत. डोंगराळ भाग असल्याने पावसाचे प्रमाण मुबलक आहे, परंतु पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने शहराला पाणीटंचाई कायम भेडसावते.

शहराची भौगोलिक रचना लक्षात घेता जलवाहिन्या टाकल्या असल्या तरी चढ-उतारामुळे शहरात कुठे पाणी मिळते, तर कुठे मिळत नाही अशी स्थिती आहे. नगरपालिकेकडून केवळ एक ते दीड तास पाणी येत असतांना पाणी मीटरचा अट्टाहास का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

कचरा संकलनाची माहिती

नगरपालिका प्रशासनाकडून कचरा संकलनाचे काम दोन घंटागाडय़ांच्या माध्यमातून होते. कर्मचाऱ्यांकडून ओला कचरा- सुका कचरा वेगवेगळा करून मागितला जातो. कचरा बादलीला नगरपालिकेने स्टिकर्स लावले आहेत. या स्टिकरवरून बायोमेट्रिक पद्धतीने दररोज त्या त्या घरातून कचरा बाहेर टाकला जातो की नाही ही माहिती घेतली जात आहे. यात जर कोणी दोषी आढळले तर त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.