दीपावलीच्या आनंदपर्वात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पांगुळघर या पाडय़ावर सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेने उभारलेल्या जलप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. सोशल फोरमचे जलतज्ज्ञ, समाज माध्यमांतील आर्थिक लोकसहभाग आणि गावकऱ्यांचे श्रमदान यामुळे  टँकरमुक्त होणारे पांगुळघर हे ११ वे गाव ठरले. अनेक वर्षे पाण्यासाठी भयंकर यातना सोसलेल्या या गावातील महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हीच फोरमच्या पुढील कामासाठी प्रेरणा आहे.

अनेक वर्षांपासून पांगुळघर दुष्काळग्रस्त गाव होते. जुलै ते जानेवारीपर्यंत गावातील विहिरीस पाणी असते. जानेवारीनंतर संपूर्ण गावात टंचाई निर्माण होते. या दरम्यान एकतर टँकरने पाणी पुरवठा अथवा एक किलोमीटर खोल दरीतील झऱ्यावर तासन्तास बसून कष्टाने मिळवलेले पाणी हंडय़ाने डोक्यावरून आणणे हे दोनच पर्याय राहतात. गावच्या पाणी प्रश्नाची माहिती सोशल नेटवर्किंग फोरमला मिळाल्यावर फोरमच्या पथकाने गावाची पाहणी केली आणि हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन स्वीकारले. या पाश्र्वभूमीवर, काही महिन्यांपासून पांगुळघर येथील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एसएनएफ पथक प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांना यश मिळाले आणि गावात पाणी पोहोचले. सोशल फोरमच्या सदस्यांनी लोकसहभागातून विहीर बांधण्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य घेऊन दिले. खरशेत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात टाकी बांधली गेली. या योजनेसाठी राहुल कदम यांच्या प्रयत्नातून २००४ च्या आरटीओ तुकडीने आर्थिक मदत केली. या प्रकल्पाचे दिवाळी पर्वात लोकार्पण करण्यात आले.

गावातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, नवीन कपडे आणि फराळाचे पदार्थ देऊन दिवाळीचा पहिला दिवा वंचितांच्या दारी ही गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेली संकल्पनाही राबवण्यात आली. पाणी आणण्यासाठी जाणारा वेळ आता अभ्यासासाठी देऊ  असे आश्वासन गावातील चिमुरडय़ांनी दिले. लोकार्पणास माजी पालिका आयुक्त जीवन सोनवणे, विजया सोनवणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, संदीप निमसे, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, प्रशांत बच्छाव, डॉ. पंकज भदाणे, सरपंच कमल गवळी आदी उपस्थित होते.

असा सुटला प्रश्न

दरवर्षी जानेवारी ते जून दरम्यान पाणीटंचाईला तोंड देणारे हे गाव टँकर किंवा दरीतील झऱ्यांवर अवलंबून असायचे. गावची पाहणी करून भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने गावापासून काही अंतरावर पाण्याची शक्यता तपासली. दरीतून वाहणाऱ्या नदीच्या काठावर उन्हाळ्यातही पाणी टिकू शकेल अशा जागेचा शोध घेण्यात आला आणि पाण्याच्या स्त्रोताचा अंदाज आल्यावर ग्रामस्थांनी श्रमदानातून विहीर खोदली. विशेष म्हणजे, केवळ दहा फूटवर पाणी लागले आणि पांगूळघरवासीयांनी एकच जल्लोष केला. प्रचंड खोल दरीतील विहिरीतून उंचावर वसलेल्या गावात वीज पंपाने पाणी उचलून गावातील टाकीपर्यंत पोहोचवले आणि पांगुळघर कायमस्वरूपी टँकरमुक्त झाले.