टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या नाशिक जिल्ह्य़ात बंधाऱ्यालगतच्या खड्डय़ातून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने एका वृध्देचा बळी गेल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडली. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंतीबरोबर अनेकांना जीवही धोक्यात घालावा लागत आहे.
धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सर्व भागांत कमी-अधिक प्रमाणात टंचाईची झळ बसत आहे. निमशहरी व टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर वा तत्सम मार्गाने काहीअंशी पाणी पुरवठा होत असला तरी दुर्गम पाडय़ांसाठी अशी काही व्यवस्था नाही. यामुळे पाडय़ांवरील ग्रामस्थांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती हा एकमेव पर्याय असतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जांभुळवाडी पाडय़ात ही स्थिती आहे. गावातील साळुबाई वारे (६०) या लगतच्या बंधाऱ्याजवळील खड्डय़ातून पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाणी पाय घसरल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. दगडावर आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार अन्य एका महिलेने पाहिला. त्यांनी वारे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. अनेक पाडय़ांवर पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी गतवर्षी प्रशासनाने ३० लाख रुपये खर्च करून नवीन योजना सुरू केली. त्या योजनेचा काही पाडय़ांना लाभ झाला, मात्र जांभूळ पाडय़ाकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.