नाशिक : अंतर्गत वादात पोलिसांकडे तक्रार केल्याने पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नेऊन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला ठाण्याच्या पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

येवला तालुक्यात वायबोधी परिसरात सोमनाथ मोरे (४०) हा पत्नी शीतल (३५) सोबत राहत होता. दोघांमध्ये अंतर्गत वाद सुरू होते. या वादातून सोमनाथ हा शीतलला मारहाण आणि शिवीगाळ करत असे. त्यामुळे शीतलने पतीविरोधात येवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोमनाथला बोलावून त्याची कानउघाडणी केली. हा राग मनात ठेवत सोमनाथने सर्व काही सुरळीत असल्याचे भासवले. गुरुवारी पत्नी शीतलला सोबत घेऊन सप्तशृंग गडावर देवदर्शनासाठी जात असल्याचे त्याने घरी सांगितले. गड परिसरात आल्यावर शीतलचा गळा दाबून खून केला. हा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी गडावरील भवानी तलावाच्या उत्तर दिशेला असलेल्या जंगलातील ओहळ परिसरात मृतदेह फेकला.

दरम्यान, पाऊस असल्याने जंगल परिसरात फारसे कोणी फिरकले नाही. परिसरातील काही मुले मंगळवारी दुपारी ओहळात खेकडे पकडण्यासाठी गेले असता त्यांना मृतदेह दिसून आला. त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या ठिकाणी संशयित सोमनाथचे निवडणूक ओळखपत्र सापडले.

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर वणी परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन तो संशयित सोमनाथ असल्याची ओळख पटल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.