संतप्त रहिवाशांचा महामार्गावर रास्ता रोको भरधाव ट्रकने धडक दिल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर पंचवटीतील अमृतधाम चौफुलीजवळ युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी घडलेल्या या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करीत सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरली. सकाळी साडेसातच्या सुमारास ओझरकडून भरधाव येणाऱ्या ट्रकची पंचवटीतील अमृतधाम चौफुलीवर तारवालानगरकडून बिडी कामगारनगरकडे जाणाऱ्या टेम्पोला धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की ट्रक टेम्पोला काही अंतरावर फरपटत घेऊन गेला. रस्त्याच्या कडेला रिक्षाजवळ वृत्तपत्र वाचत बसलेल्या रवींद्र सुरेश बोचरे (१९, रा. विडी कामगारनगर) हा युवक त्यात सापडला. ट्रक आणि टेम्पोने चिरडल्याने रवींद्रचा जागीच मृत्यू झाला, तर राजेंद्र भामरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्रचे वडील रिक्षाचालक असून तो वडिलांसमवेत दूध घेण्यासाठी अमृतधाम चौफुलीवर आला होता. त्याचे वडील चहा पिण्यासाठी गेले असताना तो रिक्षाजवळ वृत्तपत्र वाचत थांबला आणि त्याच वेळी अपघात झाला. अपघातानंतर विडी कामगारनगर, गोपाळनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत या ठिकाणी खासदार, आमदार येत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह हलविण्यात आला. त्यानंतर पुन्हा काही वेळाने महिलांनी चौफुलीवर येत ठिय्या दिला. या ठिकाणी कायमस्वरूपी तीन ते चार पोलिसांची नेमणूक करावी, उड्डाणपूल करावा, अशा मागण्या त्यांनी मांडल्या. आंदोलनामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी महिलांना त्यांच्या भावना संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अपघातप्रकरणी ट्रकचालक, टेम्पोचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.