जिल्हा परिषद, पंचायत समिती येवला तालुका माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला तालुक्यात भुजबळ यांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादी काँग्रेस कितपत तग धरू शकेल, हीच चर्चा सध्या सुरू आहे. भुजबळ यांच्या नेतृत्वाविना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उतरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी इतर पक्षांनी प्रयत्न सुरू केले असून स्थानिक राजकारण्यांनी पुन्हा तालुक्यावर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल या उद्देशाने व्यूहरचना केली आहे. येवला तालुक्यातील मुखेड, पाटोदा, नगरसूल, अंदरसूल आणि राजापूर या पाच गटापैकी पाटोद्याचा अपवादवगळता भुजबळ आल्यापासून इतर चारही गटात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पंचायत समितीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. २०१२ च्या निवडणुकीत माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, मविप्रचे संचालक अंबादास बनकर, माणिकराव शिंदे हे चारही नेते भुजबळांबरोबर होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत यश मिळविणे राष्ट्रवादीला सोपे गेले. २०१४ च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या पालखीचे भोई झालेले माजी आमदार मारोतराव पवार यांनी आपले पुतणे संभाजी पवार यांच्यासह शिवसेनेत प्रवेश करून थेट भुजबळांना आव्हान दिले होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर सावरगाव गणाची निवडणूक, जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, नगर परिषदेसह दूध संघातही राष्ट्रवादीला दणका बसला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवरही पवार-दराडे एकत्र आल्याचा परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पवार-दराडे यांच्या घरातील महिलांना राजापूर, नगरसूल गटातून संधी मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे अॅड. माणिकराव शिंदे यांची पत्नी उषाताई शिंदे यांचा पालिका निवडणुकीत पराभव झाला होता. राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी सहकार्य न केल्याने हा पराभव झाल्याची सल अॅड. शिंदे यांना आहे. अंदरसूल गटात अॅड. शिंदे यांचे पुत्र संकेत शिंदे यांसह इच्छुकांची अधिक गर्दी आहे. राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर यांचा पाटोद्याकडे असलेला कल इतर इच्छुकांसाठी नाराजीचे कारण बनू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांपुढे स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराजवंतांवर भाजपची नजर आहे. तालुका अध्यक्ष राजू परदेशी, माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भाजपचे निष्ठावंत आणि उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इतर पक्षातील इच्छुकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत असून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे. भुजबळांच्या गैरहजेरीनंतरही राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित राहते की नव्याने बळ मिळालेली शिवसेना तसेच भाजप काही करिश्मा निर्माण करते, हे या निवडणुकीत दिसणार आहे. काँग्रेस सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष अरुण आहेर यांनी म्हटले आहे. पक्षीय बलाबल सद्यस्थितीत येवला तालुक्यातील राजापूर, नगरसूल, अंदरसूल, मुखेड या चार गटावर राष्ट्रवादीची, तर पाटोदा गटात शिवसेनेची सत्ता आहे. पंचायत समितीत १० पैकी सात गणात राष्ट्रवादी, तर तीन गणात शिवसेनेचे वर्चस्व आहे.