जळगाव शहरासह जिल्ह्यात संस्था-संघटनांतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा केला जात असताना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे १० वर्षांच्या मुलाचा रविवारी पतंग उडवीत असताना तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला. अक्षय महाजन (माळी) असे मृत मुलाचे नाव आहे. हेही वाचा- जळगाव : पुरणपोळी विक्रीतून सात लाखांची उलाढाल, ग्रामीण भागातील सहा हजार महिलांना रोजगार अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील मूळ रहिवासी महाजन (माळी) कुटुंब सध्या हिंगोणे बुद्रुक येथे उदरनिर्वाहासाठी वास्तव्याला आहे. रविवारी मकरसंक्रांतीनिमित्त संजय महाजन यांचा मुलगा अक्षय हा पतंग उडवीत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा गावातील अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिरात पाचवीत शिकत होता. तो विहिरीत पडल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे हिंगोणे आणि कळमसरे या गावांवर शोककळा पसरली आहे. संजय महाजन यांचा अक्षय एकुलता मुलगा होता. त्याला बहीण आहे.