कधीकाळी गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकरोडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा डोके वर काढत असून टोळक्याने व्यावसायिकावर हल्ला केल्यानंतर देवळालीतील एका घरावर दगडफेक करीत धुडगूस घातला. टोळक्याने खुलेआम हवेत शस्त्र फिरवत हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेही वाचा- नाशिक: द्राक्ष उत्पादकाची एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक याबाबत विशाल गोसावी (धनगर गल्ली,देवळाली गाव) यांनी तक्रार दिली. गोसावी यांचा टिळकपथ रस्त्यावर वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. गोसावी आणि त्यांचे कामगार नेहमीप्रमाणे दुकानात काम करीत असतांना संशयित टोळक्याने गोसावी यांचे शालक तेजस गिरी यांच्याशी झालेल्या वादाची कुरापत काढली. टोळक्याने गोसावी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. संशयितांनी हवेत धारदार शस्त्र फिरवून दहशत निर्माण केली. या हल्ल्यात गोसावी गंभीर जखमी झाले. यानंतर टोळक्याने आपला मोर्चा देवळाली गावातील बाबू गेणू रस्ता भागाकडे वळवला. हेही वाचा- नाशिकमध्येच ५० हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री; दर पाडण्यास नाफेड जबाबदार असल्याचा आरोप वरची गल्लीतील एका घरावर दगडफेक केली. याबाबत बाळू खेलुकर यांनी तकार दिली. टोळक्याने पुतण्या संदेश याच्या समवेत झालेल्या वादातून मोटारीतून येत घरावर दगडफेक केल्याचे म्हटले आहे. कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊन हा हल्ला केला. या घटनाक्रमाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मयूर जानराव, तुषार जाधव, कमलेश जानराव, रोहित नवगिरे, दिनेश खरे, मोगल दाणी या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.