गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नांदगाव, दिंडोरीसह आसपासच्या भागास मुसळधार पावसाने झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पालखेडमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील कादवा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असून परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. नाशिकचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आज दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे. हा विसर्ग १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या दिलेल्या नियमावलीप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करावी अशा, सूचना दिल्या आहेत. तसेच नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं. तसेच त्यांनी जिल्ह्याला आजही अतिवृष्टीचा इशारा देत नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, २८ तारखेलाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा येवला तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर तुलनेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुरळक पाऊस होता. मंगळवारी पहाटेपासून नाशिक, दिंडोरी, नांदगाव व आसपासच्या भागात पावसाने जोर पकडला. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पुरामुळे काही भागांशी संपर्क खंडित झाला होता.