अहमदनगर जिल्ह्यामधील लोणीमध्ये पतीने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवीचंद ब्राह्मणे असे या आरोपीचे नाव असून ब्राह्मणे हा मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लोणीतील पीव्हीपी कॉलेजसमोर देवीचंद ब्राह्मणे (४५ वर्ष) हा पत्नी संगीता (वय ३५ वर्ष) आणि तीन मुलांसह राहत होता. मंगळवारी पहाटे ब्राह्मणेने राहत्या घरात आधी पत्नी संगीताची कु-हाडीने वार करुन हत्या केली. यानंतर निशा (१५ वर्ष) आणि स्नेहल उर्फ नेहा (११) या दोन मुलींची हत्या केली. शेवटी मुलगा हर्षवर्धन (७ वर्ष) याची गळा दाबून हत्या केल्यावर देवीचंदने घराला कुलूप लावून थेट पोलीस ठाणे गाठले. देवीचंदने स्वतःच या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

देवीचंद ब्राह्मणे हा बीए बीएड असून त्याला नोकरीही नव्हती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून नैराश्यात होता. यासाठी त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही सुरु होते. नैराश्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.