काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी तर काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली. आज हेच पक्ष राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्रितपणे मोर्चा काढत असल्याबाबत पत्रकार परिषदेत उपस्थित झालेल्या प्रश्नावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढल्याचे दिसले. त्यांनी ध्वनिक्षेपक हाती घेत पत्रकारांना खडे बोल सुनावले. दादांचा आवाज आधीच भारदस्त. त्यात पारा चढलेला व सोबतीला ध्वनिक्षेपक. यामुळे वातावरणाचा रागरंग क्षणार्धात पालटला. नाशिक येथे मंगळवारी पोहोचलेल्या संघर्ष यात्रे दरम्यान असा काही प्रश्न उपस्थित होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. मिनी मंत्रालयातील राजकारणाने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली दरी कशी मिटणार, असा प्रश्न काही स्थानिक पदाधिकारी व सदस्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करणारे विरोधक आज सेना-भाजपच्या विरोधात यात्रा काढत असल्याचा संदेश गेला. हा विरोधाभास काहींना खटकल्याने त्यांनी यात्रेत सहभागी होणे टाळले. काहींनी लग्नाचे कारण देऊन अंतर राखले. या स्थितीवर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. नाशिक येथे पोहोचलेल्या संघर्ष यात्रेत मंगळवारी सकाळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बऱ्याच कालावधीनंतर दादांना राग आल्याचे पक्षीय पदाधिकाऱ्यांनाही पाहावयास मिळाले. जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने भाजपशी युती केली. त्या अंतर्गत पक्षाच्या माजी आमदाराने सदस्यांची मुख्यमंत्र्यांशीही भेट घडवून आणली. तेव्हा संबंधित माजी आमदार राष्ट्रवादीचे आहेत की भाजपचे असा प्रश्नही उपस्थितांना पडला होता. या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाल्यावर दादांना राग अनावर झाला. दादांचा पारा चढल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हस्तक्षेप करत प्रश्नाचे उत्तर देऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदारकीही ओवाळून टाकू स्थानिक स्तरावर झालेली आघाडी आणि विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा यांची कोणी गल्लत करू नये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यातील विरोधी पक्ष एकत्रितपणे लढा देत आहेत. सर्व नेत्यांच्या दृष्टीने कर्जमाफीचा निर्णय होणे यास महत्व आहे. सर्वपक्षीय विरोधकांचा शेतकऱ्यांना दिलासा देणे हा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी १९ आमदारांचे निलंबन झाले. विधी मंडळात विरोधी पक्षांच्या एकूण आमदारांची संख्या १४० आहे. आमचे सर्व सदस्य निलंबित केले तरी चालतील, परंतु, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वा उपाध्यक्षपद हा गौण विषय आहे. आम्ही आमची आमदारकी ओवाळून टाकण्याच्या मानसिकतेपर्यंत आलो असल्याचे दादांनी सांगितले.