नाशिक: बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीत १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या खर्चात झालेला कथित गैरव्यवहार सद्य:स्थितीत चर्चेत असून याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांसोबत ग्रामविकास अधिकाऱ्याच्या सहभागाविषयी चर्चा रंगली आहे. या प्रकरणात शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन आणि माजी तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपाची जिल्हा प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रुप ग्रामपंचायतीत पदाचा गैरवापर करून तत्कालीन पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी २०२०-२१ या वर्षांत मंजूर झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. विविध विकासकामांसह अंगणवाडी, स्तनदा माता पोषण आहार आणि गणवेश खरेदी आदी कामे न करता पूर्वीच्या दुसऱ्या योजनेतून कामे केल्याचे दर्शवून लाखो रुपये लाटल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर होत आहे. यात पाण्याची टाकी, जलवाहिनी आदी कामांचा समावेश आहे. यासंदर्भात शासकीय कामे न करता ठेकेदारांची लाखो रुपयांची देयके देय करण्यात सहभागी तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच मोजमाप करणारे कंत्राटी अभियंता, शाखा अभियंता यांच्याकडून वसुली करण्याची मागणी बागलाण शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषेदेत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, सरपंच शीतल नंदन, ग्रामपंचायत सदस्य निखिल कासार, प्रीती कोठावदे आदींनी ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके यांनी डिजिटल कीचा गैरवापर करून १४ आणि १५ व्या वित्त आयोगातील पैशाबाबत गौडबंगाल केल्याचा आरोप केला. या प्रकरणात ग्रामपंचायतीचे ठराव बदलण्यात आल्याचा गौप्यस्फोट करीत ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक, संगणक परिचालक यांच्यावर दबाव निर्माण केल्याचा दावा केला. याबाबत गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना माहिती देण्यात आली असूनही अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही, सदर प्रकारात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य संख्या आहे; परंतु त्यात एका गटात नऊ आणि दुसऱ्या गटात आठ ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा सरपंच पदावरून आपापसात वाद सुरू असून ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी मी न केलेल्या आरोपांची खापरहंडी माझ्यावर फोडून नाहक बदनामी करत आहेत. - स्वप्निल ठोके (ग्रामविकास अधिकारी) ग्रामविकास अधिकारी आणि विरोधक यांनी संगनमताने लाखो रुपयांचा अपहार करून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सर्व भ्रष्टाचारास ग्रामविकास अधिकारी जबाबदार आहेत. - शीतल नंदन (सरपंच, ताहाराबाद)