युवकाच्या आत्महत्येस पोलिसांचा जाच कारणीभूत असल्याचा आरोप करीत नातेवाईक गंगापूर पोलीस ठाण्याच्या आवारात जमल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. बुधवारी दुपारी मयत विजू जाधव, दीपक दिवे आणि त्यांचे काही मित्र गाेदा पार्क परिसरात मद्यपान करत होते. त्याच वेळी दिवे याला कोणाचा दूरध्वनी आल्याने तो निघून गेला. तो परत न आल्याने त्याचे अपहरण झाल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. गंगापूर पोलिसांनी त्याच्यासोबत असलेला विजू जाधव आणि त्याच्या मित्रांना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी चौकशी करताना जाधव याला मारहाण केली असून त्याच दबावात त्याने पोलिसांच्या जाचाला कंटाळून रविवारी सकाळी विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप जाधव याच्या नातेवाईकांनी केला आहे. हेही वाचा- महावितरणकडून शाळांची कोंडी? जुन्या शाळांकडून इतर आकार शुल्काच्या नावाखाली वसुलीचा प्रयत्न याविषयी गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रियाझ शेख यांनी आपली भूमिका मांडली. विजु जाधवने दिवे यास भ्रमणध्वनी करून बोलावले होते, अशी दिवे याच्या पत्नीची तक्रार होती. दिवे यास शेवटचे विजूसोबतच पाहिल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू होता. पोलिसांनी कुठलीही मारहाण केली नाही. रविवारी चौकशीसाठी त्याला बोलावले होते. त्याच्या भावाने त्याला पोलीस ठाण्याच्या आवारात सोडले. त्या वेळी रस्त्यातच त्याने विषारी औषध प्राशन केले होते. पोलीस ठाण्याच्या आवारातील लोकांना त्याने आपण विष घेतले असल्याचे सांगितले. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता त्या आधीच त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करुन या प्रकाराची चौकशी होईल, असे आश्वासन दिले.