लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असतांना शहर परिसरात नागरिकांना कृत्रीम पाणी टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. सध्या घरोघरी उन्हाळ्यातील खाद्यपदार्थांची कामे, लग्नसराईच्या कामांची गडबड सुरू असतांना टंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे महिलांचे हाल होत असतांना यामागे पाणी पळवा पळवीचे राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे.

तापमानाचा पारा वाढू लागला असतांना महिलांचीही डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे. महिलांकडून उन्हाळी घरगुती कामांना सुरूवात झाली आहे. या कामांना पाण्याची गरज भासत असताना सध्या नाशिककरांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहर परिसरातील चेतना नगर, दामोदर नगर, वासन नगर, वडाळा गाव, सदिच्छा नगर सह नाशिकरोड परिसरात कृत्रीम पाणी टंचाई उदभवू लागली आहे. यामुळे दैनंदिन कामकाजासह अतिरिक्त कामे करण्यासही अडचण येत आहेत. कमी वेळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी नियोजित वेळेआधीच पाणी पुरवठा बंद होत आहे.

याविषयी प्रभाग क्रमांक ३१ च्या माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांनी मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा, पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न होणे यासह अन्य काही तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगितले. यामध्ये चेतना नगर, पांडवनगरी, दामोदर नगर यासह काही भागाचा समावेश आहे. याविषयी सातत्याने सिडको पाणी पुरवठा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यात येत आहे. परंतु, त्यांच्याकडून टोलवा टोलवीची उत्तरे दिली जात आहेत. वास्तविक या परिसराची लोकसंख्या पाहता उपलब्ध पाणीसाठ्यातील काही पाणी हे नाशिकरोडने पळविले आहे. यामुळे येथील पाण्याच्या टाक्या भरत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

शहर परिसरात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली असतांना राजकारण्यांकडून पाणी पळविण्याचा आरोप होत आहे. याविषयी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होवू शकला नाही.

काँग्रेसचा इशारा

प्रभाग क्रमांक १४ मधील जहांगीर मशीद, कब्रस्तानजवळील कोळीवाडा येथे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक पूर्व विभाश्च्या उपअभियंत्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. परिसरातील नागरीक हे गरीब व रोजंदारी करणारे असून पाण्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यामुळे कुटूंबात रोज भांडणे होत असल्याने कोळीवाड्यात नवीन पाच इंच जलवाहिनी टाकून पाणी प्रश्न सोडवावा, अन्यथा महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial water shortage in many areas including chetna nagar nashik mrj
First published on: 28-03-2023 at 18:44 IST