लांडे खून प्रकरण : भानुदास कोतकरसह तीन मुलांना शिक्षा, आमदार कर्डिले यांची मुक्तता नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात येथील न्यायालयाने काँग्रेसचा निलंबित जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्याची तीन मुले माजी महापौर संदीप याच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली. या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्निल पवार व वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तर संशयित भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात ऐनवेळी साक्ष बदलल्यावरून मृत लांडे यांची पत्नी व भावासह १२ जणांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. १९ मे २००८ रोजी मूळचा शेवगाव येथील लॉटरी विक्रेता असलेल्या अशोक भीमराज लांडे याचा केडगावमध्ये मारहाण करून खून करण्यात आला. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्य़ाचीही दखल न घेतल्याने या घटनेचे साक्षीदार शंकरराव राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१३ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला पुढे नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, नगरचे माजी महापौर संदीप कोतकर, सचिन व अमोल कोतकर यांच्यासह एकूण १५ जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नाशिकचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन सहा जणांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने भानुदास कोतकर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पुरावे नष्ट केल्यावरून भानुदान कोतकरला तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्वप्निल पवार आणि वैभव अडसूळ यांना दोषी धरत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. उर्वरित नऊ संशयितांची पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली. त्यात भाजप आमदार कर्डिले यांच्यासह भाऊसाहेब उन्हवणे, राजेश धवन, विजय काळे, अनिल पानसंबळ, संतोष धवन, सुनील बोंडे, औदुंबर कोतकर, सचिन सातपुते यांचा समावेश आहे. कर्डिले यांच्यावर मयताच्या कुटुंबीयांना आर्थिक देवाणघेवाणीचे आमिष दाखविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याबाबतची माहिती सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी दिली. या प्रकरणात अशोक यांची पत्नी अर्चना लांडे, भाऊ उन्मेष लांडे, नंदू सुरसे, सुरेश गायकवाड, अरुण धोत्रे, बंडू दुबे, दिलीप लांडे, अरुण पवार, विनायक पवार, भाऊसाहेब कराळे, ज्ञानदेव धामणे यांनी ऐनवेळी साक्ष फिरविली. त्याची दखल घेत न्यायालयाने नोटीस बजावली.