नाशिक : भारत माता की जय ,वंदे मातरम् , महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देत पंचवटी कारंजा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून पंचवटी ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत, पंचवटी ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष उद्धव पवार, महिला कॉंग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, पंचवटी महिला ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष कल्पना पांडे आदी उपस्थित होते. पंचवटी कारंजापासून निघालेली पदयात्रा गजानन चौक, नागचौक, सेवाकुंज, निमाणीमार्गे पेठ रोड, फुलेनगरमार्गे पुढे गेली.

मार्गात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुढे पदयात्रा दत्तनगर, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँडमार्गे गेल्यावर गंगा घाटावर समारोप करण्यात आला. यावेळी शरद आहेर यांनी केंद्रातील मोदी सरकारकडून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप केला. वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त असून देशातील लोकशाही संपुष्टात आणली जात असून देश वाचविण्यासाठी कॉंग्रेस देशभरात प्रत्येक जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा काढत असल्याचे सांगितले. कल्पना पांडे यांनी आभार मानले.