जळगाव : प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने भुसावळ–मिरज तसेच अमरावती–पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सण-उत्सव व सुट्ट्यांच्या कालावधीत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
मध्य रेल्वे भुसावळ मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ ते मिरज दरम्यान दोन फेर्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१२०९ ही विशेष गाडी २३ जानेवारी रोजी भुसावळ येथून दुपारी ०४.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.५० वाजता मिरज येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०१२१० ही २६ जानेवारी रोजी मिरज येथून सायंकाळी ०७.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता भुसावळ येथे पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी आणि सांगली येथे दोन्ही बाजूने थांबे असतील.
तसेच अमरावती ते पनवेल दरम्यानही दोन फेर्यांची अनारक्षित विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०१४१६ ही २२ जानेवारी रोजी अमरावती येथून दुपारी १२ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४१५ ही २६ जानेवारी रोजी पनवेल येथून रात्री ०७.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० वाजता अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा आणि कर्जत येथे दोन्ही बाजूने थांबे देण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडून प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून दोन विशेष अनारक्षित गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही विशेष गाड्यांची रचना प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आली असून, प्रत्येकी १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशा एकूण १८ डब्यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण गाडी अनारक्षित स्वरूपाची असल्याने तिकीट उपलब्धतेचा ताण कमी होऊन सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः अल्प व मध्यम अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, बाजारपेठ तसेच दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास करता येणार आहे. सण-उत्सवांच्या काळात तसेच गर्दीच्या दिवसांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी या विशेष गाड्यांमुळे अतिरिक्त प्रवासी क्षमतेचा लाभ मिळणार असून, नियमित गाड्यांवरील ताणही कमी होण्यास मदत होईल.
या विशेष गाड्यांचे थांबे, आगमन-प्रस्थान वेळा तसेच संपूर्ण वेळापत्रकाची सविस्तर माहिती प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एनटीईएस मोबाईल अॅपवर तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वे भुसावळ मंडळाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत माहिती घेऊन नियोजन करावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
