मनमाड : शहीद किसान कलश यात्रा मनमाड परिसरातील खेडेगावासह नांदगाव तालुक्याच्या विविध गावांमध्ये दाखल झाली. यात्रेतंर्गत एकोळी, मोहेगाव, भालुर, लोहिशगवे आणि साकोरा येथे चौकसभा घेण्यात आल्या. उपस्थित शेतकर्याच्या हस्ते शहीद किसान कलशास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मनमाड गुरूद्वाराजवळ गुरूद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांनी अभिवादन केले. उत्तर महाराष्ट्रात शहीद किसान कलश यात्रा किसान सभेचे राज्य सचिव राजू देसले, अॅड. हिरालाल परदेशी, आत्माराम विसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. जिल्हा संघटक विजय दराडे, भास्करराव शिंदे, विराज देवांग, अॅड. साधना गायकवाड, देविदास भोपळे, भागातात्या बेदाडे, साहेबराव पाटील आदींसह शेतकरी आणि कार्यकर्ते या कलश यात्रेत सहभागी झाले. २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज देयक कायदा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. १२ महिन्यांपासून हे आंदोलन सुरू असतांना दडपशाही करण्याचे प्रकारही होत आहेत. पाच आंदोलक शेतकऱ्यांचा वाहनाच्या ताफ्याखाली सापडून मृत्यू झाला. शेतकरी आंदोलनाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आणि या आंदोलनात ११ महिन्यांत विविध घटनांत मृत्यू झालेल्या ६३१ शेतकर्याना आदरांजली अर्पण करण्याच्या हेतूने शहीद किसान संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पीकविमा भरपाई, सोयाबिनचा कोसळता भाव, वीज तोडणी, कर्जमाफी, बियाणे, खतांच्या चढय़ा किंमती याबाबतही जनजागृती करण्यात आली.