नाशिक : बँकांनी कर्जवितरण करतांना कागदपत्रे आणि त्या अनुषंगाने कायद्याचा आधार घेऊन सुरक्षित कर्जवाटप करावे. कायद्यातील प्रभावी तरतुदीचा अभ्यास करुन कर्जदार, जामिनदार यांच्या अधिकारांचा मेळ घालून नियोजनबध्द कर्जवसुली करावी, कर्जदार आणि बँकेचे नाते दृढ करावे. उत्पन्न, संकल्पना, संपत्तीचे वर्गीकरण तरतुदी या तीन घटकांचा समन्वय साधावा, असे प्रतिपादन पुण्याच्या महेश बँकेचे सरव्यवस्थापक श्रीकांत जाधव यांनी केले.‘दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स’ संघटनेच्यावतीने ‘सहकारी बँकांसाठी बँका’ व ‘वित्तीय संस्थांचा कर्ज वसुली कायदा आणि नियम’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन सावरकरनगर येथील क्लब हाऊसमध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना जाधव हे बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कायद्यातील प्रभावी तरतुदी, कर्जदार, जामीनदार अधिकार आणि अपील अधिकार, सरफेसी कायद्यांतर्गत मागणी नोटीस ते विक्री पर्यंत प्रक्रिया, कायद्यातील महत्त्वाचे आणि आवश्यक नमुने, प्राधिकृत अधिकार्याची कामे, सरफेसी कायद्यासंबंधीत इतर कायद्यातील तरतुदी, मालमत्ता ताबा व लिलाव प्रक्रिया, सरफेसी कायद्यासंबंधीत परिपत्रके व राजपत्र, सहकारी बँका आणि सरफेसी कायदा, शासकीय देणे हक्कांपेक्षा बँकेस प्राधान्य इतरही विषयावर जाधव यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.कार्यशाळेचे उद्घाटन संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी तसेच असोसिएशनच्या ज्येष्ठ संचालिका डॉ. शशीताई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. सूर्यवंशी यांनी बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीचे काम करताना कायद्याचे ज्ञान गरजेचे असल्याचे नमूद केले. डॉ. अहिरे यांनी बँकिंग क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आधुनिक ज्ञानाचा स्विकार करण्याची गरज असून त्याद्वारे गुणवत्तापूर्ण बँकिंग देता येईल, असे सांगितले.समारोपावेळी समर्थ सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक राधाकृष्ण नाईकवाडे यांनी कर्ज वसुली हा बँकेच्या आर्थिक स्थितीचा महत्त्वाचा भाग असतो. त्याबाबतीत कर्मचारी व अधिकार्यानी कायम जागरुक राहणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील ३३ सहकारी बँकांचे ४७ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.