नाशिक – शैक्षणिक वर्तुळात दहावी- बारावी परीक्षेला विशेष महत्व आहे. बऱ्याचवेळा दहावी, बारावीनंतर पुढे काय, या प्रश्नाच्या उत्तरासाठी चाचपणीही होते. काही वेळा पालकांकडून विद्यार्थ्यांवर विशिष्ट क्षेत्राची निवड लादली जाते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शाेधण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी होणार असून त्यासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.
दहावी-बारावीनंतर पुढे काय, हा प्रश्न परीक्षा झाल्यावर उपस्थित होतो. अनेक पालकांकडून जेईई, सीईटी, नीट या परीक्षांसाठी आठवीपासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. काही जणांचा अपवाद वगळल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य दहावी-बारावींच्या निकालावर अवलंबून असते. हातात आलेला निकाल आणि पालकांची आर्थिक क्षमता, या आधारावर आजही विद्यार्थ्यांसाठी एखादी शाखा निवडली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांची घुसमट होते. त्यांचा मानसिक कल कुठे आहे, हे न पाहता त्यांच्यावर अपेक्षा लादल्या जातात. मुळात आवड नसताना एखाद्या शाखेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी अधिकच वैतागतात. अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय कसोट्या घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यवसाय याबाबत समाजवमाध्यम, ओळखीच्या लोकांकडून मार्गदर्शन मिळत असले तरी त्याचा कल त्यांना समजावा, यासाठी समूपदेशकाद्वारे पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी किरण बावा (९४२३०२६३०२), शिवाजी औटी (९४०५४०४५९८) यांच्याशी २५ एप्रिलपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे कोणती शाखा निवडावी, याविषयी गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कल चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी समूपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
पूर्वी या मानसशास्त्रीय कसोटीसाठी पुणे गाठावे लागत होते. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक तोषिस सहन करावी लागत होती. पुणे येथे जाण्यासाठी लागणारा वेळ, खर्च यामुळे पालक आणि विद्यार्थी वैतागत होते. आता जिल्हात ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आपला कल कोणत्या दिशेने, या शोध घेणे सोपे होणार आहे. – शिवाजी औटी