नाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरपंच शीतल नंदन, तत्कालीन ग्रामसेवक स्वप्नील ठोके, ग्रामीण पाणीपुरवठा मालेगाव उपविभागाचे शाखा अभियंता विनोद पाटकर यांच्या विरोधात बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी जायखेडा पोलिसांत तक्रार दिली आहे. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातील १४ लाख ६३ हजार ६५१ रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जाते. गुन्हा दाखल झाल्याने शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या आंदोलनाला यश आले आहे. ग्रामपंचायतीत १४ आणि १५ व्या वित्त आयोगातील कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विरोधी गटाने शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या नेतृत्वात वर्षभर आंदोलन करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली होती. मात्र शासकीय यंत्रणांकडून कारवाई होत नव्हती. सबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शासन स्तरावर नेमण्यात आलेल्या चौकशी समित्यांनी देखील आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सुभाष नंदन यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराच दिल्याने खडबडून जाग आलेल्या पंचायत समितीच्या अधिकार्यानी जायखेडा पोलिसांत तक्रार दिली. १५ व्या वित्त आयोगांतर्गत ताहाराबाद ग्रामपंचायत येथे पाणी पुरवठा योजनेसाठी खोली बांधणे आणि पंपिंग यंत्रणा बसविण्यासाठी तीन लाख १४ हजार ५१२ रुपये, १५ हजार लिटर पाण्याच्या टाकीसाठी दोन लाख ४७ हजार १८८ रुपये, जलवाहिनीसाठी सहा लाख ५५ हजार १५१ रुपये तसेच ग्राम बाल विकास केंद्र अंतर्गत साहित्य ९८ हजार ५०० रुपये, शाळकरी बालकांना गणवेश वाटप ९५ हजार ५०० रुपये अशी प्रत्यक्ष कामे न करता गैरव्यवहार करण्यात आल्याचे आरोप होत आहे.