जळगावमधील धरणगाव तालुक्यातील धरणगाव-पिंपरीदरम्यान रस्त्यावरील कल्याणेहोळ गावानजीक असलेली पाटचारी मंगळवारी फुटल्यामुळे परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो लिटर पाण्याचीही नासाडी झाली आहे. हेही वाचा- जळगाव: खडसेंची सरशी; कुर्हा काकोडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ गावाजवळील नाल्यावरून गेलेल्या या पाटचारीची भिंत जीर्ण झाल्याने फुटल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पाटचारी ही अनेक वर्षांपासून शेतकर्यांसाठी हिताची ठरली आहे. गिरणा पाटबंधारे विभागांतर्गत या पाटचारीची देखभाल केली जाते. पाचोरा तालुक्यातील दहिवद येथील धरणातून आवर्तन या पाटचारीत सोडले जाते. आवर्तनाच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील शेतकरी गहू, मका, हरभरा हे पीक घेतात. यंदा धरणातून पाटबंधारे विभागांतर्गत पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. पाटचारीची जीर्ण झालेली भिंत फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी शेतकर्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांना झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.