नाशिक : सिन्नर तालुक्यातील देशवंडी, जायगाव, सोनगिरी आदी गावात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. देशवंडी येथील काही भागात अतिवृष्टी झाली. यात नुकत्याच लागवड केलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले. पावसाच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात आधीच पिकांचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही त्यास अपवाद राहिला नाही. रविवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाने शेतातील पिके होत्याची नव्हती झाली. शेतातील मातीसह लागवड केलेला कांदा रोपेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पिकाच्या नुकसानीचे संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा शेतीची दिघोळे यांनी सोमवारी पाहणी केली. चिंधु राडोमाडे यांचे ठीबक सिंचन पध्दतीने लावले कांदेही वाहून गेले.