‘डिजेमुक्ती’ गणेशोत्सव मंडळांसाठी खर्चिक

यंदा कर्णकर्कश डिजे ऐवजी पारंपरिक ढोल ताशाचा वापर व्हावा, यासाठी प्रशासन व सामाजिक संस्था यांच्याकडून प्रयत्न सुरू असताना त्यास गणेशोत्सव मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ध्वनि प्रदूषणाच्या मर्यादेमुळे ‘डिजेमुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना दृष्टीपथास येण्याची चिन्हे आहेत. मात्र, दुसरीकडे पारंपरिक वाद्यांची मागणी वाढणार असल्याने साहजिकच त्याचा परिणाम दर वाढीत झाल्याचे चित्र आहे. मागणी वाढल्याने विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांचे दर एक ते दीड लाखांच्या घरात पोहोचल्याचे गणेश मंडळांचे म्हणणे आहे.

‘नाशिक ढोल’ ही खरेतर नाशिकची ओळख. अलिकडच्या काळात ढोल वादनाकडे युवा वर्ग मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाल्यामुळे पथकांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सव काळात वाढती मागणी लक्षात घेतल्यास गणेशोत्सव मंडळांना यंदा अधिकचा आर्थिक भार सोसावा लागण्याची स्थिती आहे. कर्णकर्कश डिजेमुळे होणारे ध्वनि प्रदूषण सर्वश्रृत आहे. मिरवणुकीत ओंगळवाणी गाणी लावून रसभंग केला जात असल्याची बाब पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावली. डिजेचा वापर करणारे मंडळ कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याचे असले तरी कारवाईचा इशारा दिला गेला आहे. गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अनुभव लक्षात घेता यंदा डिजेचा वापर टाळण्याकडे बहुसंख्य मंडळांचा कल राहील. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यास सहमती दर्शविली. या एकंदर स्थितीत गणेशोत्सवात ढोल-ताशांचा आवाज घुमणार आहे. ढोल पथकांना मागणी वाढणार असल्याने पथकांनी नाशिक ढोलचे वेगळेपण जपत नव्या चाली, नवे काही प्रयोग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मुंबई-पुण्या पाठोपाठ गेल्या काही वर्षांत नाशिकमध्ये ढोल पथके स्थिरावत आहे. नाशिक ढोल शंख, घंटा, ढोल, ताशा यांच्या मदतीने तालबध्द, स्वरबध्द करीत वेगवेगळ्या लयीत बांधला जात आहे. शहरात सद्यस्थितीत २० ते २२ ढोल पथके अस्तित्वात आहेत. गणेशोत्सवानिमित्त सर्व पथकांच्या सरावाला वेग आला आहे. वेगवेगळ्या तालांचा समावेश करत नव्या चाली तयार केल्या जात आहे. त्यासाठी मुंबई, पुण्याच्या ढोल पथकांचा अभ्यास सुरू आहे. काही पथकांनी मुंबई येथील मानाच्या गणपतीच्या पूजेला वाद्य वाजविण्याचा मान मिळवला आहे. या संदर्भात तालरुद्रच्या रुचा दीक्षितने माहिती दिली. पथकात सध्या २००-२५० जणांनी नोंदणी केली. वेगवेगळ्या चालींचा अभ्यास सुरू असून सदस्यांकडे जबाबदाऱ्या विभागून दिल्या जात आहे. आपले काम सांभाळत हा छंद जोपासण्याकडे अनेकांचा कल असल्याचे रुचाने सांगितले. शिवसाम्राज्य ढोल पथकाचे सागर चौधरी यांनी सरावासोबत ढोल पथके आपले वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे सूचित केले. वेगवेगळ्या चाली तालबध्द करतांना त्यात काहींनी ढोल, ताशा यांच्यासह शिवकाली बरची या प्रकाराचा समावेश केला आहे. कालबाह्य़ झालेले नृत्य प्रकार ढोल पथकाच्या निमित्ताने पुढे येत आहे. जुने ते सोने म्हणत प्रत्येक नृत्यशैली व ताल वाद्यातील विशिष्ट लय पकडत अनोखे फ्युजन समोर येईल. पारंपरिक वादनात नवे आविष्कार दृष्टीपथास येणार असले तरी त्यासाठी गणेश मंडळांवर अधिकचा आर्थिक भार पडणार आहे. वाढती मागणी व उपलब्ध पथके यांच्यातील तफावतीने दरात लक्षणीय वाढ झाल्याची प्रतिक्रिया गणेश मंडळांकडून उमटत आहे.

एक लाखाहून अधिकची मागणी

गणेश विसर्जन मिरवणूक ‘डिजेमुक्त’ होण्यासाठी सार्वजनिक मंडळांनी तयारी दर्शविली आहे. मिरवणुकीत पारंपरिक अर्थात ढोल-ताशांचा अधिक्याने वापर होईल. परंतु, ढोल पथकांनी दरात कमालीची वाढ केली. काही ढोल पथके एक लाख वा त्याहून अधिकचा दर मागत आहे. इतकी मोठी रक्कम गणेशोत्सव मंडळ केवळ ढोलसाठी कशी खर्च करू शकतील ? लहान गणेशोत्सव मंडळांना ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढणेही अवघड होईल.

–  गजानन शेलार (दंडे हनुमान मित्र मंडळ)

मागणी वाढल्याने दर उंचावले

लेझीम पथक, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबत काही ढोल पथकांकडे विचारणा केली असून संबंधित मंडळाच्या आर्थिक क्षमतेनुसार सुपारी मागतात. यंदा त्यांना मागणी अधिक असल्याने त्याचा परिणाम पथकाच्या मानधनावर होणार आहे.

चंद्रकांत वाघुलीकर (युवक उन्नती मंडळ)

मागणी अधिक, ढोलपथके कमी

डिजेमुक्त गणेशोत्सवासाठी मंडळे ढोल पथकांना प्राधान्य देतील. यामुळे मागणी अधिक आणि ढोल पथक कमी अशी स्थिती राहिल. यामुळे बाप्पाचे आगमन ते विर्सजन या अकरा दिवसांच्या कालावधीत जमेल तसे ढोल-ताशांच्या गजरात गणेश वंदना केली जाईल. त्यासाठी काही ढोल पथकांकडे विचारणा केली असता गत वर्षांच्या तुलनेत अधिक दर मोजावे लागतील असे लक्षात येते.

वाल्मिक मोटकरी (मुंबई नाका युवक मित्र मंडळ )