जळगाव – भारतीय कृषी क्षेत्रात नैसर्गिक संसाधनांचे जतन करून अधिकाधिक फलोत्पादन कसे घेता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. मजुरांचा अकार्यक्षम वापर वाढत आहे. यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेतीत शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून जीवनात बदल करावा, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व डबलिंग फार्मर इन्कम समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरिअल फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्यातर्फे जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेला सुरुवात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे सदस्य डॉ. मेजर सिंग, इस्त्राईलमधील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल, इस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अ‍ॅम्नोन ऑफेन, कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे (चाई) अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, झारखंडच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्युचर अ‍ॅग्रीकल्चर लीडर्स इन इंडियाच्या (फाली) संचालिका नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, उत्तर बंगा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पालिका भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी, संभाजीनगरच्या तीन जणांविरुध्द गुन्हा

परिषदेचे उद्घाटन डॉ. दलवाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी अनिल जैन यांनी नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून शाश्वत विकास साधता येतो, असे सांगितले. नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. आगामी काळात शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाइट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी, रसायनांचा बेसुमार वापर झाला असून पर्यावरणपूरक काम होणे गरजेचे असल्याने धोरणकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे सांगितले. डॉ. एच. पी. सिंग यांनी प्रास्ताविकात कृषी क्षेत्रातील भविष्यातील उद्दिष्टे विशेषत: फळबागांमध्ये संशोधन आणि विकास यावर भर देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची असल्याचे सांगितले. बॅरी, डॉ. मिश्रा, डॉ. चक्रवर्ती, डॉ. सिंग, डॉ. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेत शोध चिंतन-२०२३ या शोधप्रबंधाची १५ वी आवृत्ती, सारांश पुस्तक, मागील वर्षातील इतिवृत्त व सीडी यांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुब्रम्हन्या यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विशाल नाथ यांनी आभार मानले.

हेही वाचा – पाण्यासाठी धुळेकर आक्रमक, सत्ताधारी भाजपसह मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे प्रेतयात्रा

विविध पुरस्कार प्रदान

यावेळी चाईतर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चाई ऑनरड फेलो-२०२३ या पुरस्काराने नवी दिल्ली येथील डीएआरई आणि डीजी आयसीएआरचे सचिव डॉ. हिमांशू पाठक यांचा सन्मान करण्यात आला. जीवनगौरवने डॉ. मेजर सिंग, चाई लाइफ टाइम रिक्यनुशेन अ‍वॉर्ड डॉ. बलराज सिंग, चाई ऑनररी फेलो डॉ. बिजेंद्र सिंग, प्रा. अजितकुमार कर्नाटक, निर्मल सीड्सचे डॉ. जे. सी. राजपूत यांना सन्मानित करण्यात आले. अमितसिंग मेमोरिअल फाउंडेशनच्या वतीने बबिता सिंग यांनी पुरस्कार जाहीर केले. त्यात अमित कृषी ऋषी पुरस्काराने पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांचा त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील कार्याला अधोरेखित करून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार अनिल जैन व अजित जैन यांनी स्वीकारला. अमित पद्म जागृती पुरस्कार निर्मल सीड्सला मिळाला. तो जे. सी. राजपूत यांनी स्वीकारला. अमित प्रभुध मनिषी पुरस्कार उदयपूरच्या एमपीयूएएटीचे कुलगुरू प्रा. अजितकुमार कर्नाटक यांना देण्यात आला. तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रगतिशील शेतकरी राजाराम महाजन यांना रामनंदन बाबू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

More Stories onजळगावJalgaon
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital technology required in agricultural technology says dr ashok dalwai ssb
First published on: 29-05-2023 at 16:44 IST