नाशिक : महिला या कुटूंबाची काळजी घेतांना आपले आजार अंगावर काढतात. त्यामुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी कोणतीही लाज न बाळगता कमीपणा न वाटता आपली तपासणी करावी, असे प्रतिपादन येथील श्री गुरूजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर यांनी केले आहे. नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २० मध्ये गजानन चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जनता पक्ष आणि जैन विभाग यांच्यातर्फे शिखरेवाडीतील स्वयंसिध्दा सभागृहात कर्करोग तपासणी मोफत शिबिराच्या उदघाटनप्रसंगी डॉ. गोविलकर यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना असतात. निधीही मोठय़ा प्रमाणात मिळतो. परंतु, योजना कशा प्रकारे राबवाव्या, यांची कल्पकता ही तेथील लोकप्रतिनिधीवर अवलंबून असते. त्यासाठी दूरदुष्टी असणारा लोकप्रतिनिधी असेल तर परिसराचा विकास होतो. नाशिक रोडच्या विकासाला स्थानिक लोकप्रतिनिधींचे मोठे योगदान आहे. विकासाचा ध्यास, दूरदुष्टी असणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठिंबा देवून त्यांचे कौतुक केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जैन विभाग प्रदेश अध्यक्ष संदिप भंडारी यांनी कर्करोगाबद्दल जनजागृती झाली पाहिजे, असे सांगितले. कर्करोगाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असून वेळीच उपचार झाल्यास रुग्ण रोगमुक्त होऊ शकतो, व्यसनाधिन व्यक्तीलाच कर्करोग होतो असे नव्हे तर, सर्वसाधारण नागरिकांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र हा कर्करोगमुक्त होण्यासाठी राज्यात शहराबरोबर ग्रामीण भागातही तपासणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जास्ती जास्त नागरिकांनी तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक संभाजी मोरुस्कर यांनी केले. यावेळी आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास कुलकर्णी, अंबादास पगारे, अशोक तापडिया, कांता वराडे, गोदावरी दिदी, जैन विभाग प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत उपाध्याय, विकास पगारे, गजानन तितरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभा पारगावकर यांनी केले.