लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : प्रगत आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी भागात आजही रस्त्यांअभावी बांबुच्या झोळीतून रुग्णांना आरोग्य केंद्रापर्यंत नेण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागत आहे. पुराच्या पाण्यातून वाट काढत गरोदर माता आणि इतर रुग्णांना बांबुच्या झोळीतून वाहून नेण्याच्या तीन दिवसात तीन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

धडगाव तालुक्यातील खुटवडा- कुडब्यापाडा-बुन्नीपाडादरम्यान रस्ता नसल्याने महिलेला बांबुच्या झोळीतून सात किलोमीटरवरील रुग्णालयात न्यावे लागले. गंमलीबाई पावरा (३८) असे या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी गंमलीबाई यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने झोळी करून बुन्नीपाडा येथून कुडब्यापाडा मार्गाने खुटवडा गावापर्यंत नेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. हे अंतर साडेसात किलोमीटर आहे. सध्या उदय नदीला पूर आला असल्याने या मार्गाने जाताना नदी ओलांडणे भाग पडते. गंमलीबाई यांना पुरातून वाट काढत झोळीतून खुटवडा येथे नेण्यात आले. पुढे रुग्णवाहिकेतून धडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी प्रसूतीनंतर पुन्हा रुग्णवाहिकेने खुटवडापर्यंत पोहोचवून बुन्नीपाडा येथे झोळी करून नेण्यात आले. चार वर्षांपूर्वी खुटवडा ते बुन्नीपाडा रस्ता मंजूर करण्यात आला असला तरी पुढे कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथील २९ वर्षांच्या सुमित्रा वसावे या महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना झोळीतून पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या केंद्रापर्यंत जाण्यासाठीही पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. बुधवारी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी ते गुलीआंबादरम्यान दरड कोसळल्याने महिलेला बांबुच्या झोळीतून नेण्यात येत असताना महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. शीलाबाई वळवी असे या महिलेचे नाव आहे. महिला आणि बाळ दोन्ही सुरक्षित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात विद्यार्थ्यांनाही शाळा गाठण्यासाठी पुराच्या पाण्यातूनच जावे लागते. आदिवासी वाड्या-पाड्यांना जोडण्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड प्रकल्पाची घोषणा आदिवासी विकास विभागाने केली असली तरी योग्य अंमलबजावणीअभावी ग्रामीण भागात आदिवासी बांधवांना दररोज समस्यांना सामोरे जावे लागत आहे.