गिरीश महाजन यांचा दावा नाशिक - चांगल्या कामामुळे भाजपला मागील महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. ही परंपरा आगामी निवडणुकीत कायम राहणार आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे एकत्र आले तरी भाजपची सरशी होणार असल्याचा दावा माजीमंत्री तथा नाशिकचे भाजपचे प्रभारी गिरीश महाजन यांनी केला. नाशिकच्या प्रभारीपदी पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर शनिवारी महाजन हे प्रथमच पक्ष कार्यालयात दाखल झाले. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. करोनाचे नियम धाब्यावर बसविले गेले. महाजन यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टिकास्त्र सोडले. राऊत यांच्याकडून विविध आरोप केले जात असले तरी पुरावे नसताना अशा आरोपांत कुठलेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपची सत्ता असताना संजय राऊत कोण, हे कुणालाही माहिती नव्हते. मागील विधानसभा निवडणुकीनंतर फोडाफोडी करम्ण्यात त्यांनी पुढाकार घेतला. फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत महाजन यांनी शासन, पोलीस त्यांचे काम करीत असल्याचे नमूद केले. त्यातून काही स्पष्टता आली तर त्यास अर्थ राहील असेही ते म्हणाले. सततच्या पराभवाने एकनाथ खडसे खचले असून त्यांच्या विधानांवर आपण भाष्य करणार नाही. मंत्री नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तकांकडून अल्प किंमतीत मालमत्ता घेतली आहे. हसिना पारकर यांना पैसे दिले. असे असताना राज्य शासन त्यांना देशभक्त म्हणत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.