शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटलांना शतेकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो शोक, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल. मी त्यांना शोकसंदेश पाठवतो. आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान यावर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. नवाब मलिक, संजय राऊत काहीही संदर्भ नसलेल खोट का बोलत आहात, असा संवाद यावेळी करता येईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल.”

“…तर चंद्रकांत पाटलांसाठी आपण शोकसभा आयोजित करू”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले, मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.”

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशातील अशांतता संपवण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचं मोदींनी सांगितलं. मी मोदींना विनंती करेन की पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगून हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे देशात पुन्हा आणले पाहिजे.”