मालेगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे थकीत कर्ज वसुलीसाठी सुरु करण्यात आलेली प्रक्रिया अमानुष असल्याची तक्रार करत या वसुलीला स्थगिती द्यावी म्हणून सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड मोर्चा काढला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर हा मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांचा निश्चय होता, मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाटेतच तो अडविला. हेही वाचा >>> नाशिक : भाजपचे अस्लम मणियारसह अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश येथील मनमाड चौफुलीपासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकऱ्यांशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या तारण दिलेल्या जमीनींची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. सक्तीच्या या कर्ज वसुलीमुळे जिल्ह्यातील ६२ हजाराहून अधिक शेतकरी भूमीहिन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या विषयावरून जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. यात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काही दिवसांपासून शेतकरी करीत आहेत. २०१३-२०१४ पासून सतत पडणारा ओला किंवा कोरडा दुष्काळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने बँकांचे कर्ज भरणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी थकबाकीदार झाल्याचे तसेच जिल्हा बँकेने सुरू केलेली मालमत्ता लिलाव प्रक्रिया अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर अवाजवी व्याज आकारणी होणे हेही थकबाकीचा आकडा वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुली आणि शेतजमीन लिलाव प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी, रिझर्व बँकेच्या नियमानुसार एकरकमी कर्ज फेड योजना राबवावी, आदी मागण्याही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. हेही वाचा >>> नाशिक : पळसे परिसरात बिबट्या जेरबंद पालकमंत्री भुसे यांनी शासनाकडे शेतकऱ्यांची ही कैफियत मांडावी म्हणून त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी या आधीच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भुसे आणि राजू शेट्टी यांच्यात रविवारी रात्री नाशिक येथे बैठक झाली. जिल्हा बँकेतर्फे सुरू असलेली वसुली प्रक्रिया शिथिल केली जाईल तसेच अवाजवी व्याज आकारणी संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्याचा प्रयत्न भुसे यांनी केला. मात्र शेट्टी हे लेखी आश्वासनावर अडून बसल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी संघटना मोर्चा काढण्यावर ठाम राहिली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भुसे यांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून अडविले होते. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यांवर जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा मोसम पूल, काॅलेज मैदान मार्गे भुसे यांच्या निवासस्थानाकडे जाणार होता. मात्र तत्पूर्वीच काॅलेज मैदानाजवळ पोलिसांतर्फे मोर्चा अडविण्यात आला. त्यामुळे या मैदानातच आंदोलकांनी ठिय्या दिला. दरम्यान,आंदोलन मागे घ्यावे म्हणून मंत्री भुसे हे दूरध्वनीद्वारे शेतकरी नेत्यांशी चर्चा करीत होते. मात्र लेखी आश्वासन मिळावे यासाठी आंदोलक ठाम राहिले. मोर्चात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख सिमा नरोडे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट, अर्जुन बोराडे, संदीप जगताप आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.