जळगाव : शहरातील भगीरथ कॉलनीत नातेवाइकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या अहमदनगर येथील महिलेच्या पर्समधील सुमारे पाच लाख, २५ हजारांचे दागिने चोरण्यात आल्यानंतर तीन महिन्यांनंतर तक्रार देण्यात आली. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अहमदनगर येथील सरला शेटिया (६९) या २२ जुलै रोजी त्यांच्या जळगावातील भगीरथ कॉलनीत राहत असलेल्या नातेवाइकाचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

शेटिया यांच्याकडे प्रवासात पर्स होती. पर्समध्ये पाच लाख, २५ हजारांचे दागिने होते. भगीरथ कॉलनीत पोहोचल्यानंतर त्यांनी पर्स तपासली. मात्र, पर्समधील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. दागिने चोरीस गेल्याची खात्री झाल्यानंतर तीन महिन्यांनी शेटिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.