मनमाड शहरापासून जवळ असलेल्या नागपूर येथील भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांजवळून गेलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर फेस तयार झाल्याने परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इंधन प्रकल्पांमधील रसायनांमुळे हा फेस तयार झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. परंतु, दोन्ही इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील फेसशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; मालेगावात महाविकास आघाडीचे आंदोलन

फेसयुक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले

नागापूर येथे भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन कंपन्यांचे प्रकल्प आहेत. दोन्ही कंपन्यांच्या बाजूने एक नदी गेली असून गुरुवारी या नदीला पूर आला होता. त्यात आग विझविण्यासाठी वापरला जाणारा धुक्यासारखा फेस नदीत वाहून आल्याने सर्व पूर पाण्यावर हा फेस मोठ्या प्रमाणात तरंगू लागला. त्यामुळे वर फेस आणि खाली पाणी अशी स्थिती झाली. फेसामुळे पाणीही दिसत नव्हते. हे फेसयुक्त पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने पिके खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नदीकाठच्या विहिरीच्या पाण्यात दुर्गंधीयुक्त पाण्याची चव आली असून ते पाणी बेचव लागत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. आग विझविण्यासाठी वापरले जाणारे पाणी या नदीच्या पूर पाण्यात गेले असतानाही दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.