नाशिक : शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या गणेशगावच्या विद्यार्थ्यांची सुरू असलेली पायपीट आता थांबली असून त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गणेशगाव-त्र्यंबकेश्वर बससेवा सुरू केली आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुर्गम भागातून त्र्यंबकेश्वर, हरसूल या ठिकाणी शिक्षणासाठी, नोकरी, कामधंद्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, प्रवाशांना पायपीट करावी लागत असे. बससेवा सुरु झाल्यास त्यांची ही पायपीट थांबण्याची शक्यता असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने गणेशगाव, वेळुंजे, आंबोली, सापगावमार्गे त्र्यंबकेश्वर अशी बस सुरु करण्यात आली. यामुळे गणेशगाव ते त्र्यंबकेश्वर मार्गावरील इतर गावातील विद्यार्थी, प्रवाशी यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, रामकृष्ण आरोग्य संस्थेचे स्वामी आणि परिवहन महामंडळाचे नाशिक विभागाचे सहवाहतूक अधीक्षक विनोद गणोरे, वाहतूक नियंत्रक धनराज जाधव यांच्या सहकार्याने बस सुरु करण्यात आली. बससेवा सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवशी गणेशगावात चालक, वाहकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.