नाशिक : मागील वर्षांपासून सण, उत्सवांवर करोनाचे सावट कायम आहे. उत्सवांच्या मालिके त गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदाही करोनामुळे गणेशोत्सवावर विरजण पडले असून अवघ्या महिनाभरावर गणेशोत्सव आला असला तरी बाजारपेठेत फारशी गजबज नाही. मूर्ती विक्रेत्यांमध्ये धास्ती आहे. असे असले तरी शहर परिसरातील काही मूर्ती विक्रेत्यांनी सातासमुद्रापार बाप्पाची मूर्ती पोहचविली आहे.

सणांचा राजा असलेला गणेशोत्सवाचा बाज काही वेगळाच. ढोल-ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी टाळ आणि घंटेच्या किणकिणीने बाप्पाचे आगमन घराघरांत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात होत असते. गणेशोत्सवाचे १० दिवस चैतन्याने भारलेले असतात. मागील वर्षांपासून करोनामुळे या उत्सवाचा उत्साहच गेला आहे. घरगुती गणेशोत्सव दणक्यात होत असला तरी सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवाची रया गेली आहे. यंदाही करोनाचा संसर्ग कायम असल्याने याचा परिणाम उत्सवाच्या उत्साहावर दिसून येत आहे. नाशिक येथून काही मूर्ती या सातासमुद्रापार परदेशात दाखल होतात. मागील वर्षी करोनामुळे वाहतुकीवर निर्बंध असल्याने बाप्पा सातासमुद्रापार पोहचला नाही. यंदा मात्र स्थानिक मूíतकारांनी आधीच खबरदारी घेत बाप्पांच्या प्रवासाची तयारी सुरू केली आहे.

याविषयी मूर्तिकार मयूर मोरे यांनी माहिती दिली. मागील वर्षी करोनामुळे मूर्ती परदेशात पाठवता आली नाही. यंदाही करोना आहे. परदेशात नियम कडक असल्याने तेथील लोकांनी घरगुती गणपतीसाठी मागणी नोंदवली आहे. इंग्लंडसह कतार या ठिकाणी ७०० हून अधिक गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. स्थानिक बाप्पा प्रेमींसाठी तयार करण्यात आलेल्या मूर्तीवर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू असून ९० टक्के आगाऊ नोंदणी झाली असल्याचेही मोरे यांनी नमूद केले.

दहीपूल येथील गणेशमूर्ती विक्रेते तसेच मोरया आर्टसचे मिलिंद मोरे यांनी मुंबई, पुण्यासारखा उत्साह सध्या नाशिकमध्ये नसल्याचे सांगितले. मूर्तीविषयी तुरळक प्रमाणात विचारणा होत आहे. कच्चा मालाचे भाव वाढले. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च पाहता मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

शहरातील दोनशेपेक्षा अधिक मूर्ती कारखान्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. कोकणसह अन्य ठिकाणी आलेल्या पुराचा कु ठलाही फटका स्थानिक बाजारपेठेला बसणार नाही. बाहेरगावाहून मूर्ती येताना क्वचितप्रसंगी होणारी तोडफोड पाहता स्थानिक मूíतकारांना प्राधान्य दिले जाते, असा दावा त्यांनी के ला. दरम्यान, मूर्ती बाजारातील ही अस्थिरता लक्षात घेता काहींनी हा व्यवसाय सोडून देत अन्य पर्यायी वाटेवर चालण्यास सुरुवात केली आहे.